
Cotton Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक : कपाशी
शेतकरी : प्रमेश विजयराव फाले
गाव : मासा, ता. जि. अकोला
एकूण शेती : १५ एकर
कपाशी क्षेत्र : ८ एकर
अकोला जिल्ह्यातील मासा येथील प्रमेश फाले यांच्याकडे १५ एकर शेती आहे. त्यात विविध हंगामी पिकांसह फळबाग लागवड केली जाते. मुख्यतः केळी, पपई, मका, कपाशी, सोयाबीन आदी पिकांचा समावेश असतो. यावर्षी सुमारे ८ एकरांत कपाशी लागवड करण्यात आली आहे. लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रामध्ये मागील वर्षी मका लागवड केली होती. मका पीक निघाल्यानंतर पीक अवशेष रोटरच्या साह्याने बारीक करून जमिनीत मिसळण्यात आले. मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे आलेले तण आंतरमशागत करून काढून घेतले. यावर्षी जमिनीतील ओल पाहून साधारणपणे एक जूनला कपाशी लावण्यास सुरुवात केली. कपाशी लागवडीसाठी वाण निवड करण्यास विशेष प्राधान्य दिले जाते, असे प्रमेश फाले यांनी सांगितले.
वाण निवड
लागवडीसाठी मध्यम स्वरूपाचे वाण निवडण्यात आले आहे. जेणेकरून कपाशीचे पीक निघाल्यानंतर रब्बीत दुसरे पीक घेता येईल. वाण निवड करताना रोगास कमी प्रमाणात बळी पडणारे, वेचणीसाठी सोपे आणि अपेक्षित उत्पादन मिळेल या बाबींना प्राधान्य दिले जाते.
लागवड नियोजन
सुमारे ८ एकरांत कपाशी लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार रोटर मारून जमिनीची पूर्वमशागत केली.
१ जूनला साडेतीन बाय एक फूट अंतरावर बियाणे पेरणी करण्यात आली. त्यानुसार एकरी साधारणपणे १३ हजार रोपे बसली आहेत.
पेरणी केल्यानंतर सुरुवातीचे काळात तुषार सिंचन पद्धतीने सिंचन करण्यात आले.
लागवड करतेवेळी डीएपी खताची मात्रा देण्यात आली.
लागवडीनंतर १५ दिवसांनी बैलजोडीच्या साह्याने वखराची पाळी दिली. मजुरांकरवी दोन तासातील तण काढून घेतले.
सिंचन व्यवस्थापन
कपाशी पिकामध्ये सिंचनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. या माध्यमातून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर पिकास होण्यास मदत मिळते. यावर्षी मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे पेरणीवेळी जास्त सिंचन करण्याची आवश्यकता भासली नाही. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात पिकास तुषार सिंचन पद्धतीने ३ तास सिंचन केले जाते. पीक वाढीची अवस्था आणि पावसाचा अंदाज घेऊन सिंचनाचा कालावधी कमी-जास्त केला जातो.
तण नियंत्रण
यावर्षी मॉन्सूनपूर्व पावसामुळे तणांचे प्रादुर्भाव शेतात दिसू लागला होता. पूर्वमशागतीवेळी केलेल्या उपायांमुळे या तणांचे वेळीच नियंत्रण होण्यास मदत झाली. त्यामुळे कपाशी पेरणीनंतर उगवण झालेल्या पिकात फारसे तण दिसून आले नाही. काही प्रमाणात आलेल्या तणाच्या नियंत्रणासाठी वखराची पाळी देण्यात आली. दोन तासातील तण निंदणी करून मजुरांकरवी काढून घेतले.
आगामी नियोजन
सध्या कपाशीचे ४७ दिवसांचे झाले असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
अद्याप तरी कपाशीच्या पिकावर कुठल्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत कोणतीही रासायनिक फवारणीचे घेण्याची आवश्यकता भासली नाही. येत्या काळात परिस्थितीनुरूप कीड नियंत्रणासाठी फवारणीचे नियोजन करणार आहे.
पावसाचा अंदाज घेऊन सिंचनाचा कालावधी कमी जास्त केला जाईल.
पीक ४५ ते ५० दिवसांचे झाल्यानंतर वखराची पाळी देऊन रासायनिक खताचा तिसरा डोस दिला जाईल.
खत व्यवस्थापन
लागवडीवेळी डीएपी खताची मात्रा दिली. लागवडीनंतर २५ दिवसांनी पिकास सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देण्यासाठी ८ः२१ः२१ या खताची निवड केली. या खतामध्येच पिकास आवश्यक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे वेगळी मात्रा देण्याची गरज भासत नाही.
युरिया खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यासाठी नॅनो युरियाचा फवारणीद्वारे वापर केला जातो. पीक तीस दिवसांचे झाल्यानंतर नॅनो युरियाची फवारणी करण्यात आले.
पीक ४५ ते ५० दिवसांचे झाल्यानंतर रासायनिक खताचा तिसरा डोस दिला जाईल. त्यात १०.२६.२६ आणि मॅग्नेशिअम सल्फेट खतांच्या मात्रा वखराची पाळी देऊन दिल्या जातील.
प्रमेश फाले, ७५८८०९१६४१
(शब्दांकन : गोपाल हागे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.