Washim News : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाअंतर्गत तेलबीया आदर्श गाव उपक्रम वाशीम कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मालेगाव तालुक्यातील कुतरडोह व गोकसांवगी गावात या खरीप हंगामात राबवला जात आहे. निवडलेल्या गावांतील शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रशिक्षण व पीक प्रात्यक्षिकाअंतर्गत निविष्ठा वाटप करण्यात आले.
या वेळी अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त चैतन्य देशमुख होते. मार्गदर्शक म्हणून केव्हीकेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, शास्त्रज्ञ डॉ. एस. के. देशमुख, टी. एस. देशमुख, डॉ. डी. एन. इंगोले व मालेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. पी. गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चैतन्य देशमुख यांनी वाशीम कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान व नवनवीन वाण सातत्याने उपलब्ध करून देण्याच्या हेतुने प्रयत्नशील आहे, असे सांगितले. शेतकऱ्यांनी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन तंत्र आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. काळे यांनी दत्तक गावातील उपक्रम व त्यामधील बहुपीक पद्धतीतील फायदे सांगितले. प्रास्ताविकात डॉ. देशमुख यांनी आदर्श पीक प्रात्यक्षिक पद्धतीविषयी माहिती दिली. डॉ. इंगोले यांनी तेलबिया पिकातील उत्पादन वाढ व बीजोत्पादनाची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित वाण फुले किमया (केडीएस ७५३) व बीजप्रक्रिया निविष्ठा चैतन्य देशमुख यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.
कार्यक्रम प्रमुख टी. एस. देशमुख यांनी मॉन्सून आधारित खरीप पीकलागवड तंत्राविषयी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी गिरी यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. गोकसांवगी व कुत्तरडोह येथील शेतकरी, कृषीसखी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी वाघ, पिराजी जाधव, जगन देशमुख यांनी पुढाकार घेतला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.