
Pune News: उन्हाचा चटका वाढला असताना राज्यातील मराठवाडा, पूर्व विदर्भ, नगर, पुणे भागांत सोमवारी (ता. ५) मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी गारपीट व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने फळपिकांचे मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी जीवितहानी झाली.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाचा कमालीचा पारा वाढला आहे. त्यातच सोमवारी (ता.५) दुपारनंतर पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव तसेच अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील वनकुटे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाने चांगलाच दणका दिला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांचे व आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले.
मराठवाड्यातील जालना तालुक्यातील रामनगर, इंदेवाडी, देवमुर्ती, सामनगाव या ठिकाणी सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शिवाय परतूर शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याशिवाय मंठा, जाफराबाद, घनसावंगी, अंबड तालुक्यांत येथेही पावसाने हजेरी लावली.
अंबड तालुक्यातील आमलगाव येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बदनापूर शहर परिसरात दुपारी ३ ते ३.४० च्या दरम्यान वादळी पाऊस झाला. पंधरा ते वीस मिनिटे तुरळक गारपीटही झाली. कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी पावसाचे तासभर तांडव चालले. माहोरा येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. रोहिलागड किनगाव नांदी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने हजेरी लावली.
परभणीतील जिंतूर, शहर व परिसरात हलका पाऊस पडला. पूर्व विदर्भातील भातपट्ट्यासह वर्धा जिल्ह्याला गारपीट, वादळीवारा त्यासोबतच मुसळधार अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपले. यामध्ये धान, आंबा, उन्हाळी पिके त्यासोबतच भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. रविवारी देखील मध्यरात्रीपासून सलग तीन तास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यात उन्हाळी धानासह मका पिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याचा फटका बसून आंबे गळून पडले. तसेच, भाजीपाला पिकाचे नुकसान झाले.कुरखेडा तालुक्यात सौरपंपाचे पॅनेल वादळाने उडून गेले.
चंद्रपूर जिल्ह्यात देखील दोन दिवसांपासून गारपीट होत आहे. नागभीड तालुक्यातील गंगासार हेटी परिसरात वादळामुळे विजेचे खांब कोसळले. राजूरा तालुक्यात गोवरी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यातच अर्धा तास गारपिटीचा तडाखा बसला. गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच गोवरी येथे एवढी गारपीट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील गोवारी येथे वादळामुळे काही भागात विजेच्या ताराही तुटून पडल्या. अशाच तुटून पडलेल्या जिवंत वीज तारेच्या धक्क्याने प्रभाकर गणपत क्षीरसागर (रा. दाताळा) यांचा मृत्यू झाला. आकाशवाणी केंद्र परिसरात ही घटना घडली. चंद्रपूर- मूल मार्गावर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.