
Ratnagiri News : गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका कातळ परिसरातील धूळफेक पेरण्यांना बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तर हा पाऊस पुढे काही दिवस असाच राहिला, तर खरिपाच्या पेरण्यांना धोका होऊ शकतो. जमिनीत ओलावा राहिल्यामुळे रोपांच्या उगवणक्षमतेवर परिणाम होईल आणि उगवलेली रोपे कमकुवत होतील, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.\
रत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर भात क्षेत्र आहे. गतवर्षी झालेल्या शासकीय मोजणीनुसार ४७ हजार हेक्टरवर भात लावण्या करण्यात आल्या होत्या. यंदा २००९ नंतर प्रथमच पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे खरिपातील भात लावण्यांचा प्रश्न गंभीर झालेला आहे. यंदाच्या खरीप हंगामाचे शेतकऱ्यांना वेध लागले असून शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यातील आली आहेत.
मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मशागतीच्या कामांचे नियोजन कोलमडले आहे. विशेषतः उन्हाळी शेती केलेल्या अनेक भागांतील शेतमळ्यात पावसाचे पाणी साचलेले आहे. मशागतीसह त्या मळ्यांमधील भाजावळीची कामे करायची कशी, असा प्रश्न आहे.
मेच्या शेवटच्या पंधरवड्यामध्ये शेतकऱ्यांकडून कातळ परिसरातील धूळफेक पेरण्या केल्या जातात. परंतु सततच्या पावसामुळे त्यालाही ब्रेक लागला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास त्या शेतांमध्ये धुळफेक पेरण्या करण्याऐवजी नियमित भाताची लावणी करावी लागण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
दुसऱ्या बाजूला आणखी काही दिवस पावसाचा असाच जोर कायम राहिल्यास जमिनीमध्ये ओलावा वाढणार आहे. पाऊस न थांबल्यास जमिनीतील ओलाव्याचा खरीप हंगामात झालेल्या पेरणीतील रोपांच्या उगवणक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.