
Nashik News : मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात व वाघ खोऱ्यात सलग चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतीमाल व शेतीकामे पूर्णतः ठप्प पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. १४) वडनेर खाकुर्डी येथील वीज महावितरणच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत निषेध केला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महावितरण विभागाचा वायरमन शरद पगार हे कोणतीही जबाबदारी पार पाडत नसून, वारंवार संपर्क साधूनही त्यांनी भ्रमणध्वनी बंद ठेवलेला होता. वीज खंडित असतानाही त्यांनी कोणतीही मदत केली नाही.
यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांनी वाघ खोरे परिसरात तुटलेल्या व अडथळा आणणाऱ्या वीज तारांचे निरीक्षण करून झाडांच्या अडथळा आणणाऱ्या फांद्या स्वतः कापून टाकल्या.
आंदोलनादरम्यान वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु केवळ आश्वासनांवरच बोळवण करण्यात आली.
शेतकऱ्यांची मागणी
गेल्या अनेक महिन्यांपासून वळवाडे शिवारात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वायरमन त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत. फोनवर संपर्क साधला तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. शेतकरीच वीज दुरुस्त करण्याचे काम स्वतः करून घेतात.
वायरमनची चौकशी करून त्यांची बदली न करता थेट निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. वीजपुरवठा त्वरित सुरळीत करून भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी, यासाठी वरिष्ठ कार्यालयात शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.