
Baliraj Mofat Veej Scheme : राज्यात शेतकऱ्यांकडून कृषी पंपाच्या थकीत वीजबिलाची वसूली सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महावितरणकडून शेतकऱ्यांना फोन कॉल आणि मेसेजवरून वीजबिलाची थकबाकी भरण्याचा तगादा लावला जात आहे. थकबाकी भरली नाही तर मात्र कृषीपंपाचा वीज पुरवठा बंद केला जाईल, असा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
राज्यात १ एप्रिल २०२४ पासून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत राज्यातील ४४.३ लाख ७.५ एचपीपर्यंतच्या कृषी पंपासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी पुढील पाच वर्ष राज्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत वीज मिळत आहे. परंतु कृषी पंपाच्या वीजबिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थकीत वीजबिल वसूल करणार नाही, अशी ग्वाही दिली होती. परंतु आता मात्र राज्य सरकारकडून महावितरणने थकीत वीजबिलाची वसूली सुरू केली आहे. त्यामुळे मोफत वीज असूनही थकबाकीदार शेतकऱ्यांवर वीज तोडणीची टांगती तलावर कायम आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन उपकार केल्याची भावना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखवत आहेत. परंतु राज्यातील शेतकऱ्यांना आठ ते दहा तासही वीज पुरवठा केला जात नाही. मात्र तरीही जादाचे युनिट्सचा वापर दाखवून शेतकऱ्यांवर वीजबबिलाची थकबाकी दाखवली जाते. शेतकऱ्यांना अव्वाची सव्वा बील दिलं जातात. त्यामुळे शेतकरी वीजबील भरत नाहीत, असं जाणकार सांगतात.
मोफत विजेचं गाजर देऊन महावितरण सक्तीने थकबाकी वसूल करत असल्याचं शेतकरी पिंपरखेड बु (ता.घनसावंगी जि.जालना) धोंडीराम सानप सांगतात. "महावितरणाच्या तालुका कार्यालयातून कर्मचाऱ्यांने कॉल करून विजेची थकबाकी भरण्यास सांगितलं. त्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावर खत, बियाणे खरेदी करावं की, वीजबिलाची थकबाकी भरावं, हा पेच निर्माण झाला आहे." असंही सानप सांगतात.
पुढच्या काळात मॉन्सूनचे खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं पिकांना संरक्षित सिंचनाची सोय करावी लागणार आहे. सध्याही पूर्वमोसमी पाऊस चांगला पडला. त्यामुळे कापसाची लागवड केली आहे. परंतु पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे कृषीपंपानं पिकांना पाणी देत आहोत. थकबाकी भरली नाही तर महावितरण जोडणी तोडेल. त्यावेळी पीक करपून जाईल, अशी भीती हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा मिळावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. परंतु त्यावर राज्य सरकारकडून केवळ घोषणा केल्या जात आहेत, असं तक्रार शेतकरी करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.