
Pune News: कृषी विभागाच्या सेवांना गती देण्यासाठी आठ अभ्यास गटांकडून अभ्यास आराखडे सादर केले आहेत. ‘या अभ्यास गटांमधील काही उपयुक्त मुद्द्यांचा समावेश राज्याच्या विस्तार धोरणांमध्ये होण्याची शक्यता आहे,’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.
कृषी विभागाने ‘खरीप हंगाम २०२५’ च्या नियोजनासाठी पुण्याच्या वॅमनिकॉम येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप मंगळवारी (ता. ८) झाला. या वेळी कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासमोर अभ्यास अहवालांचे सादरीकरण झाले.
विभागीय कृषी सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या या अभ्यास गटात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा समावेश होता. आराखडे तयार करण्यापूर्वी कृषी सचिवांनी प्रत्येक गटामध्ये समूह चर्चा घडवून आणली. तसेच, प्रत्येक गटाच्या कामाची माहिती घेतली. कृषी खात्याच्या वाटचालीत थेट क्षेत्रीय पातळीवरून सूचना मागविणे किंवा अभ्यास आराखडे मागविण्याचा प्रयत्न प्रथमच झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी कृषी सचिवांच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
संनियंत्रण, मूल्यांकनावर अभ्यास
राज्याचे फलोत्पादन क्षेत्र देशात आघाडीवर आहे. तथापि, क्षेत्रविस्ताराला अजून वाव असून, मूल्यसाखळीचे बळकटीकरण झालेले नाही. त्यासाठी कोकण विभागातील कृषी अधिकाऱ्यांनी अभ्यासाचे कृषी सहसंचालक बालाजी ताटे यांनी सादरीकरण केले. राज्य व केंद्राच्या विविध योजना राबविताना संनियंत्रण अद्याप होत नाही. काही योजना रेंगाळतात; तर काही योजनांमध्ये आर्थिक अनागोंदी होते.
त्यानंतर ‘मार्चएण्ड’च्या योजनांमधील त्रुटींवर चर्चा होत असते. त्यामुळे प्रभावी संनियंत्रणाच्या नेमक्या कार्यपद्धती काय असाव्यात, याविषयी कोल्हापूर विभागाने सहसंचालक अजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास केला. कृषी योजनांची अंमलबजावणी मूल्यांकन महत्त्वाचे असते. परंतु सध्या ते होत नसून मूल्यांकनाच्या नेमक्या कार्यपद्धती काय असाव्यात, याविषयी सहसंचालक प्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर विभागाने अभ्यास केला आहे.
शेतीमाल मूल्यवृद्धीसाठी प्रयत्न
राज्यातील शेतकरी उत्पादकांचे तयार झालेले गट, या गटांच्या कंपन्या यातून शेतीमालाची झालेली मूल्यवृद्धी याबाबत नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी सहसंचालक सुभाष काटकर यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास केला आहे. कृषी विभागाकडे सध्या राज्यभर विविध रोपवाटिका, तालुका बीजगुणन केंद्रे व फळरोपवाटिका आहेत. मात्र या साधनसामग्रीचा सध्या प्रभावी वापर होत नाही.
त्याबाबत लातूर विभागाचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी अभ्यास आराखडा सादर केला. कापूस हे राज्यातील मुख्य पीक असून त्याची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासाला वाव आहे. मात्र त्यासाठी नेमके काय करायला हवे, याचा अभ्यास नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पुण्याचे कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने यांनी कृषिसेवा व कामकाज वेळापत्रकाचे नियोजन याविषयावर अभ्यास आराखडा मांडला.
माध्यमांना दुसऱ्या दिवशीही प्रवेश नाकारला
दरम्यान, या वेळी सोयाबीन उत्पादन वाढ, कृत्रिम बुद्धिमत्ता, काटेकोर शेती, कृषी संशोधन, हवामानावर आधारित कृषी सल्ला, खरीप हंगाम नियोजन या विषयांवर चर्चा झाली. मात्र कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीदेखील माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला.
योजनांमधील द्विरुक्ती टाळण्याचा प्रयत्न
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविल्या जात असताना राज्यात सध्या एकाच घटकावर दोन्ही शासनांकडून लाभ दिला जात आहे. ही द्विरुक्ती टाळण्यासाठी काही घटकांचे विलगीकरण करून योजनांची अंमलबजावणी सुलभ करण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे. त्याबाबत सहसंचालक प्रमोद लहाळे यांच्या नेतृत्वाखाली अमरावती कृषी विभागाने अभ्यास केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.