Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Agriculture Effect on Climate Change : हवामान बदलाला पूरक म्हणजे नेमकं काय करायला हवं, यावर तो काहीच बोलत नाही. तीव्र ऊन, अवकाळी पाऊस, जोरदार वारा यांचा पाच फळपिकांवर कसा वाईट परिणाम झाला, त्याच्या या नोंदी.
Climate Change
Climate ChangeAgrowon

Climate Changes Update : हवामानातील बदल चकीत करणारे, कल्पनेपलीकडचे आहेत. माणसांवर, जनावरांवर आणि फळझाडांवरही त्याचे वाईट परिणाम होत आहेत. हे बदल असे अचानक घडत आहेत, की आपत्तीपूर्व नियोजन करणं शक्य नाही. अनेक घटना अशा आहेत, की त्यामागचा कार्यकारणभाव लक्षात येत नाही. आमच्या बागेतील पाच फळपिकांवर तीव्र ऊन, अवकाळी पाऊस, जोरदार वारा यांचा वाईट परिणाम झाला. त्याचा अनुभव मी येथे मांडत आहे.

आंबा

आमच्या बागेत एकूण २५ आंब्याची झाडं आहेत. त्यातील पाच गावरान, बाकी केसर. या वर्षीचा संभाव्य तीव्र ऊन्हाळा लक्षात घेऊन पहिल्यांदाच आंब्याच्या झाडांना भरपूर पाणी दिलं. त्याआधी गांडूळ खत, वर्मी कल्चर टाकलं. झाडाखालच्या ओलीचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून झाडांच्या बुडाला गोलाकार सोयाबीन गुळी, कडबा कुट्टीचं आच्छादन केलं. यंदा सात-आठ आंब्यांनाच वेळेवर मोहर आला. काही झाडांना दोन टप्प्यांत तर काही झाडांना तीन टप्प्यांत मोहर आला. मोहर भरपूर आला.

आम्ही शक्यतो मोहरावर फवारणी करीत नाही. पण मित्राचा सल्ला ऐकून दोन जैविक औषधांच्या फवारण्या केल्या. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. पहिल्यांदा मोहरगळती नंतर फळगळती मोठ्या प्रमाणात झाली. आंबे आवळ्याएवढे, लिंबाएवढे होऊन गळतच राहिले. दीड महिन्यांनंतर असं लक्षात आलं, की सुरुवातीला ज्या आंब्यांना मोहर आला होता, त्या मोहराचेच आंबे टिकले. आमच्या २५ पैकी ५ झाडांना एकही आंबा टिकला नाही. उरलेल्या झाडांपैकी एका छोट्या झाडाला २, दुसऱ्या एका छोट्या झाडाला ५, एका गावरान आंब्याला एकच, दोन झाडांना ३-४ असं फळांचं प्रमाण राहिलं. फक्त ६ केसर आंब्यांना बऱ्यापैकी फळं राहिली; पण शेवटपर्यंत वाऱ्यामुळं गळती चालूच होती.

जमीन, खत, पाणी, हवामान समान असूनही प्रत्येक झाडाची स्थिती वेगळी असल्याचं पहिल्यांदाच घडलंय. फक्त २ छोट्या झाडांचे आंबे मध्यम आकाराचे झाले, तर ३ मध्यम आकाराच्या केसर झाडांना लागलेल्या आंब्याचा आकार छोटाच राहिला. या तिन्हींचे पाड पडले, पाखरं दररोज किमान सात-आठ आंबे टोकरून पाडू लागले तेव्हा या आंब्यांची फळं काढली. मात्र हे आंबे दरवर्षीइतके चवदार नाहीत. काही आंबे पिकलेच नाहीत. एका गावरान आंब्याला दोन वेळा भरपूर मोहर लागूनही त्याला एकही आंबा लागला नाही. दुसऱ्या दोन्ही गावरान आंब्यांचा आकार खूपच छोटा राहिला.

Climate Change
Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

याचे पाड पडत आहेत. मागची तीन वर्षे याला लागलेले आंबे आकाराने मध्यम, मोठे म्हणण्यासारखे होते. खत, पाणी देऊनही आंबे का मोठे झाले नाहीत, याचं उत्तर मिळत नाही. काही आंबे तोंडाला नासत आहेत. गारपीट झाल्यावर असं होऊ शकतं. पण इथं गारपीट झालेली नाही. फक्त ३ छोट्या झाडांची फळं आकाराने वाढली आहेत. अद्याप त्यांचा पाड झालेला नाही. दरवर्षीप्रमाणे आंबे गुणवत्तापूर्ण नाहीत. याचे कारण हवामानातील बदलांपेक्षा वेगळं काही असू शकत नाही. गेल्या दहा वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या बागा मोडल्या, याचं कारण हेच आहे. अर्थात कितीही वाईट परिस्थिती राहिली तरी, आम्हाला कमी-जास्त आंबे खायला मिळतात, हा गेल्या सात-आठ वर्षांचा अनुभव आहे.

पेरू

गतवर्षी आम्ही गावरान पेरूची सहा मोठी झाडं काढली. नव्याने तैवान पिंक आणि सरदार या संकरित जातीची तीस रोपं लावली. सहा महिन्यांआधी पेरूचा पहिला हंगाम घेतला. महिनाभर भरपूर पेरू खाल्ले, किरकोळ विक्री केली. त्यानंतर या सगळ्या झाडांची छाटणी केली. दोन आठवड्यांनंतर या झाडांना भरपूर खत आणि पाणी दिलं. काही दिवसांतच या झाडांना फुटवा आणि भरपूर फुलं आली.

अतिरिक्त फुलं काढली. सगळ्या झाडांना गावरान आवळ्याच्या आकाराचे पेरू आलेत. गेल्या आठवड्यापासून अचानक या फळांची गळ मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. जवळपास निम्म्यापेक्षा अधिक फळगळ झाली. खरं तर पेरूची फळगळ कधीच होत नाही. झाडांना पुरेस अन्न-पाणी आहे. झाडं ताजीतवानी आहेत. या झाडांनाही गुळीचं आच्छादन आहे. यासंदर्भात मी चार-पाच मित्रांशी बोललो.

पेरूच्या फळांची गळ होतेय, हे त्यांच्यासाठीही आश्‍चर्यकारक आहे. एकाने पाणी कमी पडत असेल, असं मत व्यक्त केलं. पण आठवड्यातून तीन वेळा मी स्वत: पाणी देतोय. मी बारकाईने बघितलं. देठामध्ये कमकुवतपणा आल्याचं लक्षात आलं. पण त्यामागचं कारण कळालं नाही. पेरूचं पण आंब्यासारखंच आहे. कितीही गळ झाली तरी आम्हाला खाण्यापुरते पेरू मिळतीलच. पण हीच बाग व्यावसायिक असती तर, त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी आलं असतं.

Climate Change
Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

केळी

याच जमिनीत गेली सहा वर्षे आम्ही केळी घेतोय. दोन वर्षे केळीला एवढी फळं लागली, की केळी मोठ्या प्रमाणात गाई-म्हशींना खाऊ घातली. उन्हाळ्यात दोन-चार झाडं सुकायची, काही मध्येच मोडायची; पण केळी निघायचीच. गतवर्षी ती सगळी केळी काढून जुलैमध्ये नवीन केळी लावली. गोबरगॅसजवळ १२ रोपं लावली. ही जमीन जास्तच हलकी आहे. बागेत आठ रोपं जुन्याच खोडापासून उगवली, वाढली. यांना सतत भरपूर पाणी देऊनही यातील बरीचशी झाडं जळून जाण्याची शक्यता आहे. उन्हामुळं केळीची पानं करपून चाललीत. या सगळ्या झाडांनाही गुळीचं आच्छादन आहे. खत दिलं आहे. पण तीव्र उन्हापुढे यांचा निभाव लागणे कठीण आहे. ही झाडं आता वाळून गेली तरी पावसाळ्यात ती पुन्हा फुटतीलच.

या झाडांना नेटसेटच्या जाळीने सावली करण्याचा सल्ला काहींनी फेसबुकवर दिला. खर्चाचं सोडून द्या, पण खुल्या जागेत असा कसलाच मांडव टिकणार नाही. एक वावटळ मांडव साफ करेल. मी विचार केलाय, दररोज या झाडांना पाणी देत राहायचं. टिकतील ते टिकतील, जातील ते जातील. यांना जगविण्यासाठी अनावश्यक पैसे आणि ऊर्जा घालवून काहीही उपयोग नाही. जे होईल ते शांतपणे बघत वाटचाल चालू ठेवणे म्हणजेच हवामान बदलास जुळवून घेत शेती करणे अशी सध्यापुरती माझी व्याख्या आहे.

सीताफळ

हे फळ आमच्या रानाचं खास फळ आहे. माझ्या बालपणी माळावर, मळ्यात, पांदण रस्त्यावर शेकडो सीताफळाची झाडं होती. विविध कारणांनी ही झाडं काढण्यात आली. त्याची भरपाई म्हणून २०१८ मध्ये मी तीन-चारशे गावरान सीताफळाची रोपं लावली. आम्ही २०२१ पासूनच भरपूर सीताफळं खातोय. पहिले दोन वर्षे सीताफळाला पाणी, शेणखत दिलं. आता ती स्वावलंबी बनलीत. त्यांना काहीच करावं लागत नाही.

गावरान सीताफळ म्हणून विचार केला, तर उन्हाळ्यात त्याची पूर्ण पानगळ होते. झाडं वाळून गेल्यासारखं दिसतं. केवळ सांगाडा उरतो. नवखा माणूस ही झाडं वाळून गेली असंच समजतो. पण मे अखेरीस किंवा जूनमध्ये मोठा पाऊस झाला, की या सगळ्या झाडांना लुसलुशीत पानं फुटतात. ती वाढतात. जुलैमध्ये फुलं लागून छोटी छोटी फळं बनतात आणि दिवाळीमध्ये सीताफळाचा हंगाम सुरू होतो. वर्षानुवर्षे सीताफळांचं असं चक्र चालू होतं. पण अवकाळी पावसानं हे चक्र बदलून टाकलंय.

आताची स्थिती बघितली, तर ७० टक्के झाडांना पानं आणि सोबतच फुलं आलीत. काही झाडांना तर आवळ्याच्या आकाराची सीताफळं तयार झालीत. काही झाडं अद्याप फुटली नाहीत. आता लागलेली ही फळं ऐन पावसाळ्यात परिपक्व होतात आणि त्यात अळ्या होतात. ती खाण्यालायक राहत नाहीत. ही बिगरमोसमी फळं काढूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शिवाय सगळ्या झाडांची फुलं तोडणं अशक्य आहे. सीताफळातून कमाई काही नाही, तर खर्च कशाला करायचा? त्यामुळे मेअखेर झाडांची छाटणी करायची, असं ठरवलंय. त्यामुळे नवीन फुलं लागतीलच. जी राहतील ती फळं तशीच राहू द्यायची.

नारळ

गेल्या वर्षीपर्यंत नारळालाही ठिबकद्वारेच पाणी होते. आता पाइपने पाणी देतोय. मात्र नारळाची गरज भागेल इतकं पाणी आम्ही देऊ शकत नाही. त्यात यंदाचा उन्हाळा हा असा भयानक आहे. एकूण आठपैकी पाच झाडांना नारळ लागलेत. तीन झाडांना भरपूर. दोन वर्षांपासून घरचे नारळ खातोय. छोट्याशा नारळातही छान खोबरं निघतंय. मात्र या वर्षीच्या उन्हामुळं छोट्या हिरव्या, अपरिपक्व नारळाच्या गळतीचं प्रमाण अधिक आहे. याच्यावरही उपाय नाही. या झाडांना दररोज पाणी देणं शक्य नाही.

या सगळ्या नोंदींचा सारांश असा, की अर्ध्या एकरवरील ही छोटीशी फळबाग सांभाळणं या हवामान बदलाने अवघड करून टाकलं आहे. माझी फळबाग ही व्यावसायिक शेतीच्या हेतूने केलेली नाही, म्हणून मी या साऱ्याकडे तटस्थपणे बघू शकतो. पण गुंतवणूक केली तर आर्थिक फटका अधिक बसणार हे उघड आहे. कमीत कमी जोखमीची शेती करणे हा एवढाच एक सोयीचा मार्ग आहे. तो मी स्वीकारला आहे.

९०९६१३९६६६

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com