
Agriculture Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक : संत्रा
शेतकरी : राजीव वामनराव घोडे
गाव : येरंडगाव, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती
एकूण शेती : २४ एकर
संत्रा लागवड : ७ एकर
संत्रा झाडे : १०५०
अमरावती जिल्ह्यातील येरंडगाव (ता. नांदगाव खंडेश्वर) येथील राजीव वामनराव घोडे यांची २२एकर शेती आहे. सध्या ७ एकरांत संत्रा लागवड आहे. त्यात सुमारे ११०० झाडे आहेत. राजीव यांचे वडील वामनराव घोडे यांनी सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी ५०० संत्रा झाडांची लागवड केली होती. या बागेतील दर्जेदार फळांना चांगला बाजारभाव मिळत होता. हीच बाब ध्यानात घेऊन संत्रा लागवडीत वाढ केली.
सध्या पाच एकरांवर १३ वर्षे वयाची ७५० झाडे, तर दोन एकरांत ९ वर्षाची ३०० संत्रा झाडे आहेत. संपूर्ण लागवड १८ बाय १६ फूट अंतरावर करण्यात आली आहे. संत्रा बागेच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनात प्रयोगशील शेतकरी विपुल चौधरी यांचे मार्गदर्शन मिळते. सध्या बागेत आंबिया बहरातील फळे लागलेली आहेत. आगामी काळात फळांचा दर्जा आणि चकाकी राखण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे राजीव घोडे यांनी सांगितले.
फळबागेला पूरक म्हणून करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसायाची जोड दिली आहे. त्यात सुमारे ८ हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. याशिवाय उर्वरित क्षेत्रामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, तर रब्बी हंगामात हरभरा आणि गहू या पिकांची लागवड केली जाते. पोल्ट्री व्यवसायातून मिळणाऱ्या कोंबडीखताचा वापर हंगामी पिकांसह फळबागेत केला जातो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य उत्तम राहण्यासह आणि उत्पादन चांगले मिळण्यास मदत होते.
आंबिया बहर नियोजन
आंबिया बहर धरण्यासाठी बाग साधारणपणे ५ ऑक्टोबरनंतर ताणावर सोडण्यात आली. हा ताण २५ नोव्हेंबरच्या दरम्यान पाटपाणी देऊन तोडला.
बागेतील झाडांस अपेक्षित ताण बसण्यासाठी शिफारशीत रासायनिक घटकांची १५ नोंव्हेबरला फवारणी करण्यात आली.
त्यानंतर झाडावरील सल काढून बोर्डो मिश्रणाची फवारणी घेतली.
ताण तोडण्यापूर्वी बागेस कुक्कुट खताचा वापर करण्यात आला. बागेत रासायनिक खतांचा किमान वापर करण्यावर भर दिला जातो.
ताण तोडल्यानंतर साधारण १० डिसेंबरला नवती फुटण्यास सुरुवात झाली. यावेळी १२ः६१ः०, रासायनिक कीटकनाशक यांची फवारणी करण्यात आली.
या फवारणीनंतर २१ दिवसांच्या अंतराने नियमित ठिबकद्वारे सिंचन करण्यास सातत्य राखण्यात आले.
जानेवारीमध्ये झाडांवर हरभरा आकाराची फळधारणा झाल्यानंतर शिफारशीत रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी घेण्यात आली. जेणेकरून कोळी, फुलकिडे, तुडतुडे यांच्यासह रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल.
मागील कामकाज
मागील काही दिवसांत झाडांवर दर्जेदार फळे लागण्यास सुरुवात झालेली. फळांचा आकार आणि दर्जा वाढीसाठी १९ः१९ः१९ ची आळवणी करण्यात आली.
नवीन फुटलेल्या नवतीवर तुडतुडे, मावा आणि सिट्रस सायला किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी साधारण ४ जुलैला शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली.
झाडांवर फळे लागल्यानंतर वजनामुळे झाडे वाकून मोडण्याची शक्यता असते. त्यासाठी झाडांना बांबू काठीच्या मदतीने आधार देण्यात आला.
पावसाचा आणि जमिनीतील वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर देण्यात येत आहे.
आगामी नियोजन
सध्या बागेत मोठ्या आकाराची फळे लागलेली आहेत. आगामी काळात फळांचा आकार आणि दर्जा राखण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी पुन्हा एकदा १९ः१९ः१९ ची आळवणी करण्यात येईल.
जमिनीतून ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास आणि जैविक खतांच्या मात्रा देण्यात येतील. नियमितपणे जैविक घटकांची आळवणी केली जाईल.
बदलत्या वातावरणामुळे फळांवर होणारा मावा, तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घेतली जाईल.
बागेतील फळ काढणी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात मध्यात सुरू होईल.
कीड नियंत्रणावर भर
संत्रा बागेत प्रामुख्याने फुलकिडे, मावा, तुडतुडे, सिट्रस सायला या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच जुलै महिन्यात देठावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होते. फळगळ टाळण्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते. तसेच किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जातो. त्यामुळे प्रभावी नियंत्रण होण्यास मदत मिळते.
भूमिगत ठिबकचा अवलंब
सिंचनाच्या पाण्याची शाश्वत सोय होण्याकरिता चार वेळा बोअरवेल खोदल्या. मात्र त्यास पाणी लागले नाही. त्यानंतर बागेपासून २ किमी अंतरावर खोदलेल्या विहरीला मुबलक पाणी लागले. तेथून बागेपर्यंत पाइप टाकत पाण्याची सोय केली आहे. संपूर्ण संत्रा बागेत ठिबकचा पर्याय अवलंबिला आहे. ठिबकच्या ठिबकच्या नळ्या खारुताई आणि उंदीर कुरतडून नुकसान करतात. त्यासाठी ठिबकच्या नळ्या जमिनीच्या आत सहा इंच खोलीवर लावल्या आहेत. त्यामुळे नळ्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत झाली आहे. दर चार वर्षांनी ठिबक यंत्रणा पूर्ण जमिनीबाहेर काढून नळ्यांची स्वच्छता केली जाते.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन
घरचा पोल्ट्री व्यवसाय असल्याने उपलब्ध कुक्कुट खताचा वापर शेतामध्ये केला जातो. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एकरी पाच ट्रॉली प्रमाणे पोल्ट्री खत बागेत वापरले जाते. याशिवाय सूक्ष्म जिवाणू, सेंद्रिय घटकांचा वापर नियमित केला जातो. ठिबक सिंचन पद्धतीच्या माध्यमातून रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. बागेतील फळांचा दर्जा आणि आकार अपेक्षित राखण्यासाठी खत व्यवस्थापनावर भर दिला जातो. त्यासाठी ०ः५२ः३४, १३ः०:४५ या खतांच्या फवारणी घेतल्या जाते.
अवस्थेनुसार फवारणीचे नियोजन
पहिली फवारणी : १० डिसेंबर : फुलधारणा चांगली होण्यासह झाडे सशक्त होण्यासाठी.
दुसरी फवारणी : २५ डिसेंबर : फळांचा आकार वाढण्यासह, नवतीवर येणाऱ्या सिट्रस सायला किडीपासून संरक्षण मिळविण्यासाठी.
तिसरी फवारणी : १० जानेवारी : कोळी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी. तसेच ०:५२:३४ आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी.
चौथी फवारणी : फेब्रुवारीच्या शेवटी : तापमान वाढीमुळे फळगळ टाळण्यासाठी आणि झाडे सशक्त होण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी.
पाचवी फवारणी : १५ मार्च : झाडे सशक्त होण्यासाठी आणि वाढीमुळे फळगळ टाळण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी.
- राजीव घोडे, ९४०४३३८८०१
(शब्दांकन : विनोद इंगोले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.