Washim News : संत्र्याला भाव मिळत नसल्यामुळे लावलेला खर्चही निघू शकत नाही. यामुळे भोकरखेड येथील शेतकरी संतोष विष्णू लांडगे यांनी चार एकरातील संत्र्याची बाग तोडून टाकली. मागील काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी फळबाग लागवडीकडे वळतो आहे. परंतु इतर पिकांबरोबरच फळबागेची शेतीही आतबट्ट्याची ठरते आहे.
मागणी नसल्यामुळे यावर्षी संत्रा व्यापाऱ्यांनी सौदे अर्ध्यावरच सोडल्याचा कटू अनुभव आहे. स्थानिक बाजारपेठेतही संत्रा कवडीमोल दराने विकावा लागला. त्यामुळे यावर्षी संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. अर्ध्यापेक्षा जास्त संत्रा शेतातच पडून सडला होता.
संत्रा लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर संत्र्याच्या शेतामध्ये इतर कोणतीही पिके घेता येत नाहीत. त्यामुळे जमीन वर्षभर पडून राहते. संत्र्याला भाव मिळाला तर ठीक अन्यथा शेती असून नसून सारखीच. यावर्षी संत्र्याला भाव मिळाला नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते.
पुढील वर्षीही अशीच परिस्थिती झाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न काही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्यामुळे त्यांनी शेतातील संत्रा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. भोकरखेड येथील शेतकरी संतोष लांडगे यांनी चार एकर शेतीवर लागवड केलेली व जिवापाड जपलेली संत्रा बाग तोडून टाकली.
संत्रा लागवड केल्यानंतर सतत दोन वर्षे कृषी विभागात अनुदान मिळण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु कुठलेही अनुदान मिळाले नाही. शासकीय अनुदानही नाही. संत्रा बागेपासून उत्पन्न मिळत नसल्याने संत्रा काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.