
ज्योती खराडे, डॉ. प्रीती देशमुख, उद्धव मुटकुळे
Sugarcane Farming: आडसाली हंगामातील ऊस लागवड ही १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत होते. वाढीचा कालावधी हा १६ ते १८ महिन्यांचा असतो. एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत जवळपास तीन वर्षे राहते. या तिन्ही वर्षी उसाच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणे आवश्यक असते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर करावा.
सेंद्रिय खत व्यवस्थापन
सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचे आहेत. एक हेक्टर क्षेत्रातून साधारण ८ ते १० टन पाचट जमिनीत मिसळता येते. सध्या अनेक शेतकरी ते जाळताना दिसतात. पाचट जाळताना जमिनीच्या अगदी वरच्या थरात असणारे सेंद्रिय पदार्थ जळून जातात. पाचटाचे सरीत आच्छादन करून शास्त्रीय पद्धतीने कुजविले असता त्यापासून ४ ते ५ टन चांगल्या प्रतीचे कंपोष्ट उपलब्ध होऊ शकते. हे कुजवून त्याचे उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते. या सेंद्रिय खतांमुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा सुधारतो, जिवाणूंची वाढ होते, रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकंपोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात.
हिरवळीचे पीक घेण्याची पद्धत
हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडणे हा सेंद्रिय खतांचा पुरवठा करणारा चांगला पर्याय आहे. आडसाली हंगामामध्ये ताग किंवा धैंचा घेऊन लागवड करणे शक्य होत नाही. अशा वेळी ऊस पिकामध्ये हिरवळीचे आंतरपीक घेऊ शकतो.
ऊस लागवडीनंतर पहिले पाणी दिल्यावर जमिनीत वाफसा आल्यावर वरंब्याच्या मध्यभागी तागाचे आंतर पीक लावून बाळ बांधणीच्या वेळी ते जमिनीत गाडावे. हिरवळीच्या खतांचा वापर करून २७ ते ४० टक्क्यांपर्यत सेंद्रिय खतांची गरज भागवता येते.
आडसाली उसाचे एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत जवळपास तीन वर्षे राहते. या कालावधीत सेंद्रिय खते आणि हिरवळीची खते यांचा नियोजनबद्ध वापर केल्यास निश्चितच जमिनीचा पोत सुधारून सुपीकता वाढण्यास चांगलीच मदत होते.
रासायनिक खतांचा वापर
खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, योग्य पद्धत महत्त्वाची आहे. आडसाली ऊस पिकास ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद व १७० किलो पालाशची प्रति हेक्टरी वापरण्याची शिफारस आहे. त्याचप्रमाणे को ८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची २५ टक्के जास्त मात्रा द्यावी. माती परीक्षण करून घेतल्यास जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती आपल्याला कळते. त्याप्रमाणे रासायनिक खत मात्रा ठरवावी.
पीकवाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीत खत मात्रा देते वेळी नत्रयुक्त खते चार हप्त्यात विभागून द्यावीत. जमीन हलकी असेल तर नत्रयुक्त खते पाच-सहा वेळा विभागून द्यावीत. उगवण ते फुटवे येण्याच्या अवस्थेपर्यंत नत्रयुक्त खताची गरज फार कमी असते. १० टक्के नत्रयुक्त खते लागवडीपूर्वी उगवणीसाठी, मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी आणि स्फुरद व पालाशयुक्त खते प्रत्येकी ५० टक्के देणे फायदेशीर ठरते. फुटवे फुटतानाच्या अवस्थेत आणि त्यांच्या वाढीसाठी नत्रयुक्त खताची गरज असते म्हणून लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्र युक्त खताचा ४० टक्के दुसरा हप्ता व १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्रयुक्त खताचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा. जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्नघटक जास्त प्रमाणात शोषले जातात म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळेस म्हणजेच १२० दिवसांनी नत्र युक्त खताचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाशयुक्त खताचा प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता देणे आवश्यक आहे. लागणीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत.
गंधकाचा वापर
महाराष्ट्रातील जमिनीत गंधकाची कमतरता लक्षात घेता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शाश्वत उत्पादकतेसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी ऊस लागवडीच्या वेळी २४ किलो मुलद्रवी गंधक प्रति एकरी द्यावे.
सिलिकॉनचा वापर
जमिनीत सिलिकॉनचे प्रमाण जरी जास्त आलेले तरी ते बहुतांशी रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. सिलिकॉनची मोनोसिलिसिक आम्ल स्वरूपातील संयुगे क्रियाशील असतात. याच स्वरूपात पिकाकडून शोषण होते. ऊस पिकासाठी सिलिकॉनचे सहभाग महत्त्वाचा आहे. शोषण केलेले मोनोसिलिसिक आम्ल पिकाच्या पेशीद्रव्यात जेलस्वरूपात साठविले जाते. त्यामुळे पेशी कवच कठीण बनते. पानातून पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन अवर्षण परिस्थितीत पाणी टिकून राहते.
रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. प्रकाश संश्लेषण प्रकियेत वाढ होते. जमिनीत स्फुरदाची उपलब्धता वाढते.परिणामी ऊस आणि साखर उत्पादनात चांगली वाढ होते. पिकास सिलिकॉन मूलद्रव्याच्या उपलब्धतेसाठी आणि साखरेच्या अधिक उत्पादनासाठी १.५ टन बगॅसच्या राखेमध्ये २.५ लि /हे. सिलिकेट विरघळविणाऱ्या द्रवरूप जिवाणू समूह खत शिफारशीत २५ टन /हे. कंपोस्ट खतात मिसळून शिफारशीत अन्नद्रव्य मात्रेसोबत लागवडीच्या वेळी वापरावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.