Jalna News : ‘‘भारताची कापसाची उत्पादकता इतर देशाच्या मानाने अत्यंत कमी आहे. केवळ वाण हा उत्पादन देणारा घटक नसून उत्पादन वाढीसाठी लागवड पद्धतही महत्त्वाची आहे. सघन लागवड पद्धतीचा वापर करून एकरी १४ हजार ते २५ हजार झाडे व एका झाडास दहा ते २० बोंडे असे नियोजन केल्यास कापसाचे उत्पादन वाढू शकते,’’ असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेतील पीक उत्पादक विभागाचे प्रमुख डॉ. अर्जुन तायडे यांनी व्यक्त केले.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडळाच्या ३२१ व्या मासिक चर्चासत्रात ते बोलत होते. या प्रसंगी प्रदीप देशमुख आणि केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने हे उपस्थित होते.
डॉ. तायडे म्हणाले, ‘‘जगाच्या तुलनेत भारताची कापूस उत्पादकता कमी आहे. क्षेत्रीय ज्ञानाचा अभाव, योग्य वाणाची निवड न करणे, रासायनिक खते चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी देणे, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने न करणे इत्यादी त्याची महत्त्वाची कारणे आहेत. शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या मदतीने योग्य पद्धतीने कापूस लागवड करून आपली कापूस उत्पादकता वाढवावी.’’
‘सिंचनासह लागवडीचे योग्य अंतर साधा’
‘‘पाटपाणी पद्धतीमुळे पाण्याचा वापर भरपूर होऊन जमिनीत कायम वाफसा राहात नाही. जमिनीतील कमी, जादा ओलाव्यामुळे पात्या, फुले, बोंडांची गळ होते. बोंड वाढण्याच्या अवस्थेत पुरेसा ओलावा, पुरेसे अन्नद्रव्य उपलब्ध नसल्यामुळे बोंडांचे वजन कमी भरते. सिंचनाचा वापर करून लागवडीचे योग्य अंतर साधावे. त्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होईल,’’ असे प्रदीप देशमुख यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.