Wheat Irrigation Management : गव्हामध्ये आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन गरजेचे

Wheat Interculture Operation : यंदा नोव्हेंबर महिन्यापासूनच सिंचनाच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत गहू पिकामध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
Wheat
Wheat Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे

Wheat Crop Management : यंदा नोव्हेंबर महिन्यापासूनच सिंचनाच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत गहू पिकामध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. सिंचनाच्या पाण्याचे काटेकोर नियोजन आणि आंतरमशागतीची कामे वेळेवर केल्यास गहू पिकास फायदेशीर ठरते.

राज्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने, बहुतांश जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. तर ठिकाणी कांदा काढणी आणि ऊस तोडणीनंतर गहू पेरणीची तयारी सुरू आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती गव्हाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर उशिराने म्हणजेच १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करण्याची शिफारस केली आहे. गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजेच उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात एकरी १ क्विंटलपर्यंत उत्पादनात घट येण्यास सुरुवात होते. त्यामुळे १५ डिसेंबरनंतर पेरलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही.


यंदा नोव्हेंबर महिन्यापासूनच सिंचनाच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत गहू पिकामध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. सिंचनाच्या पाण्याचे काटेकोर नियोजन आणि आंतरमशागतीची कामे वेळेवर केल्यास गहू पिकास फायदेशीर ठरते.

Wheat
Wheat Farming : गव्हात आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन कसे करावे?

पाणी व्यवस्थापन ः
भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ पाळ्या, तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास पिकावर आणि एकूण उत्पादनावर होणारे संभाव्य परिणाम पाहू.
१) मुकुट मुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी)ः
या दिवसांत जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असते. त्यामुळे मुकुट मुळे कमी फुटतात आणि फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येतो. परिणामी उत्पादनात घट येते.

२) फुटवे फुटण्याची अवस्था (पेरणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) ः
ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते. पर्यायाने उत्पादनात घट येते.

३) पीक फुलोऱ्यात येण्याची अवस्था (पेरणीनंतर ७० ते ८० दिवसांनी) ः
परागसिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते. आणि उत्पादन घटते.

४) दाण्यात चीक भरण्याची अवस्था (पेरणीनंतर ९० ते १०० दिवसांनी) ः
या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होऊन वजनही कमी होते.

५) दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणीनंतर ११० दिवसांनी) ः
या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून दाण्यांची प्रत कमी होते. तसेच उत्पादनात घट येते.

Wheat
Sugarcane Management : ऊस शेतीचे काटेकोर व्यवस्थापन करणे गरजेचे

सिंचन नियोजन ः
सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्यास उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पुरेसे पाणी नसल्यास आणि फक्त एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढीलप्रमाणे सिंचन करावे.
- एक पाणी ः पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी.

- दोन पाणी ः पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५ ते ६० दिवसांनी.
- तीन पाणी ः पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५ ते ६०
दिवसांनी, तर तिसरे ७० ते ८० दिवसांनी.
- चार पाणी ः पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५ ते ६० दिवसांनी, तिसरे ७० ते ८० दिवसांनी आणि चौथे पाणी ९० ते १०० दिवसांनी द्यावे.
- पाच पाणी ः पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ४० ते ४५ दिवसांनी, तिसरे ५५ ते ६० दिवसांनी, चौथे पाणी ७० ते ८० दिवसांनी आणि शेवटचे पाचवे पाणी ९० ते १०० दिवसांनी द्यावे.

आंतरमशागत ः
गहू पिकात मुख्यतः चांदवेल, हराळी या सारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता आवश्यकतेनुसार एक किंवा दोन खुरपणी तसेच कोळपणी करून घ्यावी. आंतरमशागतीच्या कामांमुळे तणांचा बंदोबस्त होऊन जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.


पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पीक कांडी अवस्थेत आल्यानंतर मजुरांच्या मदतीने तणांचा बंदोबस्त करणे शक्य होत नाही. या अवस्थेत पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते.

खत व्यवस्थापन ः
बागायती वेळेवर पेरणी ः
- बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे २१ ते ३० दिवसांनी) ६० किलो नत्र (१३० किलो युरिया), बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) प्रति हेक्टरी प्रमाणात द्यावा.


- पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना, १९:१९:१९ या विद्राव्य खताची दोन वेळा फवारणी करावी.(१९:१९:१९ प्रति १० लिटर पाण्यात ५० ग्रॅम प्रमाणे)
- दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया)

बागायती उशिरा पेरणी ः
- बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ से.मी. अंतरावर पेरावे.
- पेरणीवेळी दोन चाड्याच्या पाभरीने नत्र खताची अर्धी मात्रा आणि संपूर्ण स्फुरद व पालाशची मात्रा द्यावी.

नत्र:स्फुरद:पालाश ९०:६०:४० किलो प्रति हेक्टर म्हणजेच ९८ किलो युरिया (दोन गोण्या युरिया) ३७५ किलो सिंगल सिंगल सुपर फॉस्फेट (७.५ गोण्या एसएसपी) आणि ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश (१.५ गोणी एमओपी) द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता म्हणजेच ९८ किलो युरिया खुरपणी केल्यानंतर तीन आठवड्यांनी पहिल्या पाण्याच्या वेळी प्रति हेक्टर प्रमाणात द्यावी.
------------------------------------------
- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९,
(मृद्‍ शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com