
ॲग्रोवन वृत्तसेवा
Satara News : सातारा : ऊसदराचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. १८) झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले आहेत.
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर जाहीर करावा, तोडणी वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, पुणे-सोलापूरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कारखानदारांनी दर जाहीर करावा, अशी मागणी संघटनांनी केली. त्यावर कारखान्यांनी ऊसदराबाबत आपली भूमिका स्पष्ट करुनच सोमवारी (ता. २३) बैठकीला यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
इतर जिल्ह्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार यावेळेस जादा दर देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांनाही होती. यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी कारखानदार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक बुधवारी नियोजन भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
विधानसभेच्या निवडणुकीमुळे यावर्षी दीड महिना उशिरा गाळप हंगाम सुरू झाला आहे. महायुतीचे आमदार निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती. पण, एकाही आमदाराने हिवाळी अधिवेशनात ऊसदराच्या प्रश्नावर आवाज उठविला नाही. तर दुसरीकडे कारखानदार एफआरपीप्रमाणे दर देणार असल्याचे सांगत आहेत. कृष्णा आणि जयवंत शुगरने यापूर्वीच पहिली उचल ३२०० रुपये जाहीर केलेली आहे. त्यामुळे इतर कारखान्यांनीही त्याप्रमाणात दर जाहीर करायला हवा. पुणे, सोलापुरातील कारखान्यांनी ज्या पद्धतीने दर जाहीर केले आहेत, त्याप्रमाणे साताऱ्यातील कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा, अशी अपेक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडली. तर कारखान्यांनी मात्र, एफआरपी प्रमाणेच होईल तो दर दिला जाईल, असे सांगितले.
या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे वासिम इनामदार, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, रयत क्रांती संघटनेचे मधुकर जाधव, जिल्हा शेतकरी संघटनेचे कमलाकर भोसले, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे गणपत यादव यांच्यासह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये शेतकरी संघटना आक्रमक
बैठकीत शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले. मागील हंगामातील ऊस बिलाची बाकी व यावेळेस चार हजार रुपये प्रतिटन दर जाहीर करायला हवा, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या चर्चेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हस्तक्षेप करत कारखान्यांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत नेमकी निर्णय घेऊनच बैठकीला यावे. पुढील बैठक येत्या सोमवारी (ता. २३) होणार असून यामध्ये हा प्रश्न सोडविण्याची भूमिका कारखान्यांच्या प्रतिनिधींनी घ्यावी, अशी सूचना केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.