
Mumbai News: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर उर्वरित जिल्ह्यांमध्ये राबविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या योजनेचे कृषी समृद्धी योजना असे नामकरण करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचना आणि कार्यपद्धतीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
ही समिती पुढील १५ दिवसांत आपला अहवाल कृषी विभागाला सादर करणार आहे. या योजनेचे नामकरण झाले असले, तरी खरीप हंगाम सुरू झाल्यानंतरही या योजनेची कार्यपद्धती आणि आवश्यक निधी नसल्याने ही योजना या हंगामात कशी राबविली जाणार या बाबत साशंकता आहे.
वातावरणातील सततच्या बदलांमुळे येणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देणे शक्य व्हावे तसेच शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी विविध घटकांचा ‘पोकरा’च्या धर्तीवर लाभ देण्यासाठी योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या योजनेसाठी वार्षिक ५ हजार कोटी आणि पाच वर्षांसाठी २५ हजार कोटी रुपयांची योजना आहे.
शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी शेततळे, सूक्ष्म सिंचन, ठिबक, तुषार सिंचन यासारख्या बाबींवर भर, नियंत्रित शेतीसाठी शेडनेट, हरितगृह, पॉलिहाऊस, संरक्षित शेती, प्लॅस्टिक अस्तरीकरण, मल्चींग पेपर, क्रॉप कव्हर, काटेकोर शेती, पॅक हाउस, गोडाउन, कोल्ड स्टोअरेज, काढणी पश्चात व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया, मूल्य साखळी विकसन, शेतीमालाचे ब्रॅंडिंग, साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन, कोल्ड स्टोअरेज, पॅक हाउस इत्यादी सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी शेळी पालन, फळबाग लागवड,
रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व मापदंडांनुसार थेट लाभ हस्तांतर तत्त्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ज्या गावांचा समावेश आहे ती वगळून राज्यातील उर्वरित गावांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे.
या योजनेची कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीत कृषी प्रक्रिया व नियोजनचे संचालक सदस्य सचिव असतील तसेच कृषी आयुक्त, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक, विस्तार व प्रशिक्षण संचालक, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, आत्मा संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक, मृद्संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक, ‘पोकरा’चे मृद् विज्ञान विशेषज्ञ या समितीचे संचालक असतील.
समितीची कार्यकक्षा
- ‘पोकरा’ प्रकल्पाच्या धर्तीवर कृषी समृद्धी योजनेची संभाव्य फलनिष्पत्ती आणि योजनेचे वितरण.
- योजनेमुळे होणारे सकारात्मक परिणाम याबाबत शिफारशी करणे.
- या योजनेकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी लक्ष्यांक निश्चित करणे.
- योजनेत अंतर्भूत असलेल्या विविध घटक अंमलबजावणी स्तरावर प्रत्यक्षात आणताना प्रशिक्षणाची गरज, भूमिका व व्याप्ती निश्चित करणे.
- कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ज्या घटकांचा समावेश करावयाचा आहे, त्या घटकांचे प्रमाण व त्यासाठी लागणारा निधी या बाबतचा ढोबळ आराखडा निश्चित करणे.
- योजनेच्या भागधारकांना द्यावयाच्या प्रशिक्षणाचा घटकनिहाय तपशील निश्चित करणे.
- योजनेची अंमलबजावणी करताना वापरावयाच्या आधुनिक तंत्रज्ञानासाठी आराखडा सुचविणे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.