
Pune News : मारकडवाडीतील ईव्हीएमविरोधातील लढाईला आता मोठे स्वरूप आले असून महाविकास आघाडीने या लढ्याला बळ दिले आहे. आज (ता.८) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारकडवाडीला भेट दिली असून लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, तुमच्याच गावात प्रशासन जमावबंदी कशी लादू शकते? ग्रामस्थांच्या निर्णयला इतका विरोध का?, असा सवाल केला.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात गावकऱ्यांनी ईव्हीएमवर अक्षेत घेतला होता. तर भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांना गावातच मताधिक्य मिळाल्याने ग्रामस्थांनी मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ३ तारखेला मतदान होणार होते. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने हे मतदान होऊ शकलं नाही. तर पोलिसांनी २०० हून ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला. याचवरून शरद पवार यांनी मारकडवाडीला भेट देण्याचे ठरवत आज ग्रामस्थांशी संवाद साधला. तर याचप्रकरणी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील मारकडवाडीला येणार असून ते येथून लाँग मार्च काढणार आहेत.
यावेळी शरद पवार यांनी, गावकऱ्यांनी पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी मॉक पोलिंगची तयारी केली मग काय चुक केली. त्यांनी याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र मतदानाच्या दिवशी या गावात जमावबंदी आदेश लागू झाला. तुमच्याच गावात प्रशासनाने तुम्हालाच जमावबंदी केली. हा कुठला कायदा?
आपल्या देशात बदल हवा म्हणून ईव्हीएम पद्धत स्वीकारली. पण आता यात बदल झाला पाहिजे अशी मागणी जनतेची आहे. लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळेच येथे बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी झाली. याला पोलिसांनी विरोध का केला? लोकांना एका नव्या दिशेने जायचे असेल तर प्रशासनाचा याला विरोध का?, असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार देखील आपल्या गावाची चर्चा करत आहेत. ते हे गाव कुठे आहे अशी विचारणा करताना आमच्याकडे गावचे अभिनंदन करत आहेत. अमेरिका, इंग्लंड सारख्या देशांमध्ये देखील आजही बॅलेटवर मतदान होते. अमेरिका सारखा देश देखील ईव्हीएमचा विचार सोडून बॅलेटवर मतदान घेत असल्याचे शरद पवार म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघ देशभर चर्चेत आला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत. मात्र जानकर यांच्या समर्थकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात उत्तम जानकर यांना कमी मतं मिळाली. तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी अधिक मतं मिळाली. पण या गावात जानकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जानकरांना कमी मतं कशी मिळाली? या संशोधनाचा विषय असल्याचं मारकडवाडीकरांचं मत आहे. या गावाला शरद पवार यांनी भेट दिली आहे.
शरद पवार यांनी काल मतांची आकडेवारी सांगत ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली होती. तर आज ते मारकडवाडी गावात गेले. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शरद पवार हे आपले अपयश झाकण्यासाठी खटाटोप करत असल्याची टीका केली आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांचा आम्ही सन्मान करतो मात्र त्यांनी या वयात असा खोटारडेपणा करू नये असा निशाना साधला आहे. आम्ही लोकसभेवेळी आमचा पराभव झाल्यावर तो स्वीकारला. पण आता महाविकास आघाडीतील नेत्यांना अपशय स्वीकारता येत नाही. शरद पवार देखील जनतेला कन्फ्युज करत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
ईव्हीएमवर जर त्यांना अक्षेप असेल तर निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या आमदारांनीही राजीनामा द्यावा. आम्ही आमच्या चुकांवर अभ्यास केला आणि पुढे गेलो. पण आता या वयात शरद पवार यांनी खोटेपणा करू नये, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.