
Amravati News: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर देशात २९ मेपासून विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गुरुवारी (ता. ८) केली.
नवी दिल्ली येथील भारतरत्न सी. सुब्रह्मण्यम सभागृहात खरीप मोहीम २०२५ या राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन पार पडले यावेळी त्यांनी ही घोषणा केली. परिषदेत १० हून अधिक राज्यांचे कृषिमंत्री उपस्थित होते. इतर कृषी मंत्र्यांनी व्हर्च्युअल पद्धतीने परिषदेत सहभाग घेतला आणि केंद्रासोबत मिळून शेतीच्या प्रगतीसाठी कार्य करण्यास सहमती दर्शवली. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान पुढे म्हणाले, की भारताच्या १४५ कोटी जनतेसाठी पुरेसे अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.
त्याकरिता कृषी विभागातील सर्व सहकारी कटिबद्ध आहेत. १९६० मध्ये सिंधू जल करार ही एक ऐतिहासिक चूक होती. देश आणि शेतकऱ्यांचे दुर्दैव होते, की आपल्या देशातून वाहणाऱ्या नद्यांचे ८० टक्के पाणी पाकिस्तानला देण्यात आले, म्हणून पहलगाम दहशतवादी घटनेनंतर सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर आपल्या शेतकऱ्यांचा हक्क आहे, प्रत्येक थेंबाचा उपयोग शेती, वीज आणि विकासासाठी करू. पंजाब, हरियाना, राजस्थान, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होईल असेही ते म्हणाले.
आज आपण शेतकऱ्यांच्या मेहनतीने अन्नधान्याचे भांडार भरले आहेत. उत्पादन सातत्याने वाढत आहे. मी आपल्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. नुकतेच आपण तांदळाच्या दोन नवीन जाती विकसित केल्या आहेत, ज्यामुळे उत्पादन वाढेल, पीक २० दिवस आधी तयार होईल, पाण्याची बचत होईल, मिथेन वायूचे उत्सर्जन कमी होईल, लवकरच या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील.
२०१४ नंतर शास्त्रज्ञांनी २,९०० नवीन जाती विकसित केल्या आहेत. ही खरीप परिषद केवळ औपचारिकता नाही. पुढे रब्बी परिषद दोन दिवसांसाठी होईल. याच मालिकेत चौहान यांनी ‘विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत शास्त्रज्ञांच्या टीम तयार करण्याची आणि त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची रूपरेषा मांडली आणि सांगितले की, या टीम गावोगावी पोहोचून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करतील.
गाव स्तरावर अभियान
आपल्याकडे १६,००० शास्त्रज्ञ आहेत, त्यापैकी ४-४ शास्त्रज्ञांच्या टीम तयार करून गाव स्तरावर जागरूकता अभियान राबवले जाईल. या टीम शेतकऱ्यांच्या सेवेसाठी वापरल्या जातील. या टीम वर्षातून दोनदा बाहेर पडतील. रब्बी पिकासाठी ऑक्टोबरमध्ये अभियान राबवले जाईल. तसेच त्यांनी राज्यांच्या कृषी मंत्र्यांना या अभियानात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.