Murud News : साडेतीनशे वर्षांपूर्वीचा जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला, मुरूड, काशीद समुद्रकिनारा, खोकरीचे गुंबज, नवाबकालीन राजवाड्याचे विशेष आकर्षण असल्याने तालुक्यात वर्षभर लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. मात्र मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने काही महिन्यांपासून पर्यटकांची संख्या रोडावल्याचे स्थानिक व्यावसायिकांकडून बोलले जात आहे.
साळाव-मुरूड हा ३० किलोमीटरचा रस्ता चौपदरी झाल्यास अलिबागला थांबणारे पर्यटक थेट मुरूड व दिवेआगर, श्रीवर्धनपर्यंत विनाअडथळा पोहोचू शकतील. वाहतूक सोयीचे झाल्यास पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यवसाय वाढतील आणि रोजीरोजीच्या प्रश्न सुटेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मुरूड शहराला पर्यटनस्थळ म्हणून ‘ब’ दर्जा प्राप्त आहे, त्या तुलनेत विकासकामे मात्र दिसून येत नाहीत. पर्यटन व्यवसायाशिवाय मुरूड तालुक्यात अन्य मोठे उद्योग-व्यवसाय नाही. जेएसडब्ल्यू उद्योग समूहात बोर्ली ते तळेखार पट्ट्यातील युवकांना आऊटसोर्सिंगच्या कामाव्यतिरिक्त अन्य काम नाही.
कोकण किनारपट्टीवरील मोठा उद्योग दिघी बंदराच्या माध्यमातून उभारण्यात आला असून व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री यांच्याकडून आता हे बंदर अदाणी उद्योग समूहाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
आगरदांडा परिसरातील लहान-मोठे उद्योग तेजीत असले तरी स्थानिकांचा प्रकल्पास विरोध असल्याचे कारण देत अदाणी समूह आगरदांडा फेज कार्यान्वित करीत नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. दिघी पोर्ट पूर्ण क्षमतेने सुरू झाले तर मुरूड तालुक्यातील अर्थचक्रे वेगाने फिरण्याची आशा स्थानिकांना आहे. कारण या बंदरामुळे खाडीपट्ट्यातील मासेमारी नष्ट झाल्याने मच्छीमारांची परवड होत आहे.
कालव्याचे काम रखडले
अंबोली धरणामुळे मुरूडसह १२ गावांचा पिण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही चांगली बाब असली तरी कालव्याची कामे आठ वर्षांपासून रखडल्याने दुबार हंगामातील सिंचनात अडचणी येत आहेत.
कालव्याचे काम पूर्ण झाल्यास १५ ते २० गावांतील सुमारे ६५० हेक्टर जमीन पाण्याखाली येऊन स्थानिकांना भात पिकासोबत फळफळावळ व दुग्ध व्यवसायासारखे जोडव्यवसाय आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. याशिवाय कृषी पर्यटनालाही चालना मिळेल.
बागायतदारांची वाताहत
मुरूड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जुन्या बागायती, वाड्या नष्ट झाल्या असून नारळ, सुपारी, आंब्यांचे उत्पादन घटले आहे. सध्या सुपारीचे ४३५ हेक्टर तर आंबा बागायत क्षेत्र ८९० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मात्र बदलत्या वातावरणामुळे नारळ, सुपारी पिकावर बुरशीजन्य पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनाचा दर्जाही घसरला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.