
Ratnagiri News : रत्नागिरी ः ज्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांबाबत विम्याची नुकसान भरपाई दिलेली नसेल, त्या सर्व विमा कंपन्यांवर शेतकऱ्यांना फसवल्याचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी दिले. तसेच जे अधिकारी बैठकीला गैरहजर होते, ज्यांनी कामचुकारपणा केला, त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्याचा अहवाल आठ दिवसांत सादर करावा असेही तटकरे यांनी सांगितले.
जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण (दिशा) समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहअध्यक्ष खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते. खासदार तटकरे म्हणाले, की दिव्यांगांसह वयोश्री योजनेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
तसेच तालुकानिहाय लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहितीही करून घेतली पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य शिबिर घेण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. शेतीसाठी सौरऊर्जेबाबत येथील भौगोलिक स्थिती वरिष्ठांना सांगावी. यांत्रिकरणाची योजना पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी. अधिकाऱ्यांनी क्षेत्रीयस्तरावर जाऊन सखोल काम करावे.
जलपर्यटन सुरू करण्याबाबत सूचना करून खासदार श्री. तटकरे म्हणाले, की जिल्ह्यात मायनिंग कुठे सुरू आहे, त्यामधून उत्पन्न किती मिळते याबाबतची माहिती द्यावी. पर्यटनाशी निगडित प्रशिक्षण देण्याबाबत कौशल्य विकास विभागाने आराखडा तयार करावा. परंपरागत व्यवसाय, पर्यटन याची सांगड घालून बचत गटांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधील दर्जेदार कामे करा.
अधिकाऱ्यांनी कसोशीने लक्ष घालून अधिक दक्षतेने काम करावे. कृषी, पर्यटन, फलोत्पादन अधिक क्षेत्रांमध्ये मोठा वाव आहे. सामाजिक समानता अतिशय उत्तम राखणारे मुलींचे चांगले प्रमाण आहे. सिंधुरत्न योजनेमधूनही चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अधिक दक्षतेने अधिकाऱ्यांनी काम करावे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी खासदार नारायण राणे म्हणाले, की निर्यात वाढण्यासाठी कोणते उत्पादने आहेत, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. शेतीमधील नवे तंत्रज्ञान, खते, पाणी याबाबतचे नियोजन आदींबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. जिल्ह्याचे पर्यायाने राज्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलून काम करावे. पर्यटन वाढीसाठी पर्यटकांसाठी सुविधा वाढवायला हव्यात.
प्रत्येक योजनांमध्ये लाभार्थ्यांचा आकडा वाढायला हवा. या योजना गरिबांना मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा. भ्रष्टाचार झाल्यास अशा अधिकाऱ्यास जाग्यावर निलंबित करा. जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी बुद्धिमत्तेला प्रामाणिकपणाची जोड द्यावी. उद्दिष्टापेक्षा जास्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बक्षीस द्या अशी सूचना त्यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.