
Nashik News: कृषी निविष्ठांवर जीएसटी लागू आहे. एकीकडे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वाढत असल्याने त्यांना अपेक्षित परतावा मिळत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी जीएसटी माफ करावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे मागणी केली आहे. तसेच पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे प्रतिपादन धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले.
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिन कार्यक्रमाचे सोमवारी (ता. १) आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. बच्छाव बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे आदींची उपस्थिती होती.
डॉ. बच्छाव म्हणाल्या, की अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे कर्जावरील व्याज माफ करण्याची गरज आहे. त्या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यात येईल. तसेच स्वामिनाथन आयोगाप्रमाणे हमीभाव मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असून, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. गुंडे म्हणाले, की ग्रामीण भागातील महिलांसाठी रेशीम शेती हा चांगला पर्याय आहे. पूरक व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न वाढ साधून त्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतील. येवल्यात रेशीम पार्क विचाराधीन असून त्यातूनही संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. सुभाष काटकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व शासनाचे धोरण या बाबत सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले. तर संजय शेवाळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विजय धात्रक यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी आत्मा प्रकल्प उपसंचालक विलास सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
...या शेतकऱ्यांचा सन्मान
रब्बी हंगाम पीकस्पर्धा २०२३ : गोरखनाथ पोपटराव राजोळे (एकलहरे), लिलाबाई मधुकर पेखळे (माडसांगवी), रामदास विठोबा करंजकर (भगूर), त्र्यंबक सुका बेंडकोळी (धोंडेगाव) यांना राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला आहे.
रब्बी हंगाम पीकस्पर्धा २०२४ : तुंगा काळू चौरे (केरोबानगर, ता. बागलाण), कौतिक सोनू चौरे (जयपूर, ता. कळवण), राजाराम भगवान गातवे (दोधेश्वर, ता. बागलाण), शांताबाई हर्षवर्धन घोडे (देवळाणे, ता. बागलाण), रमेश लक्ष्मण पवार (वेरुळे, ता. कळवण) यांना राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला.
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ः सुवर्णा राजेश भरवीरकर (अंबड, नाशिक), अश्विनी अशोक नागरगोजे (सातपूर, नाशिक), कीर्ती गोविंद दशपुते (कामटवाडे, नाशिक) यांचा तर सेंद्रिय शेतीत वूमन्स पॉवर प्रोड्यूसर कंपनी (घोटी, ता. इगतपुरी) व पेठ सेंद्रिय शेती उत्पादक कंपनी (जांबविहीर, ता. पेठ).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.