Pune News : ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’चे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी (ता. १०) रोजी कारवाई केली होती. तसेच ईडीने कन्नड सहकारी साखर कारखान्याची ५० कोटी २० लाख रुपये किंमतीची १६१ एकर जमीन जप्त केली. यावरून रोहित पवार यांनी रविवारी (ता.१०) पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. यावेळी रोहित पवार यांनी, 'ईडीकडून कन्नड येथील कारखान्यावर प्रतिकात्मक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ही पूर्ण जप्ती नाही,' असे म्हटले आहे. तसेच, 'अजूनही याबाबत ईडीकडून जप्तीची नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यावर आपण न्यायालयात जाऊ,' असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर रोहित पवार म्हणाले, 'कारखान्यावर झालेली कारवाई ही राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. ही कारवाई प्रतिकात्मक जप्तीची आहे. पूर्ण जप्ती करण्यात आलेली नाही. मी कारखाना बंद पडायला देणार नाही'.
'या कारवाई बाबत आपल्याला नोटीस आलेली नाही. तर जी नोटीस काढण्यात आलेली आहे. ती ईडीच्या ट्विटर अकाउंटवर आहे. तेथेच ती पाहण्यात आली. यामुळे जेंव्हा आम्हाला नोटीस मिळेल तेंव्हा आम्ही न्यायालयात दाद मागू', असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
तसेच 'जर एखादी जप्ती करायची असेल तर त्याबाबत नोटीस दिली जाते. १८० दिवस दिले जातात. यात मोठी प्रक्रिया असते. आपली बाजू मांडायची असते. पण येथे असे काहीच झालेले नाही. यामुळे कारखान्यावर अवलंबून सर्व शेतकरी, कर्मचारी, बँक आणि कंपनीशी निगडीत ५० ते ६० हजार लोकांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही', असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
तर लोकांची बाजू अधिवेशनात मांडल्याने, सरकारविरोधात लढत असल्यानेच ईडीने मला नोटीस पाठवली. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन अशा पद्धतीने कारवाई राज्य आणि केंद्र सरकार करत असल्याचा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.
यावेळी रोहित पवार यांनी, 'पक्षफुटीनंतर आपल्याविरोधातील कारवाईंना जोर आला आहे. मात्र आपण या कारवाई विरोधात न्यायालयात जाणार असून ही लढाई लढणार आणि जिंकणार, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
याआधी देखील ‘बारामती अॅग्रो’ लिमिटेडच्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यावरून रोहित पवार यांनी समाज माध्यमावर आपली प्रतिक्रिया टाकली होती. यात त्यांनी, 'ईडीने आम्हाला कोणतीच माहिती दिली नसून केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. जी राजकीय सूडापोटी करण्यात आली', असे रोहित पवार यांनी म्हटले होते.
तसेच, 'या कारवाईत अनेक त्रुटी आणि चूका असून बारामती अॅग्रो आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये. कारखाना बंद पडणार नाही याची हमी मी देतो. कारखाना आपल्या मालकीचा असून शेतकरी आणि कामगारांनी निश्चिंत रहावे. आपली बाजू सत्याची आणि न्यायाची आहे, हे आपण सिद्ध करू', असेही रोहित पवार यांनी म्हटले होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.