
Maharashtra Politics : कृषी निविष्ठा खरेदीतील घोटाळ्याने महाराष्ट्राचं डोकं चक्रावेल असा प्रकार आहे. मुंडे यांच्या वरदहस्तानेच ३०० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी (ता.२०) केला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली होती. या टिकेनंतर धस यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
तसेच कृषी खात्यातील घोटाळ्यात शेतकऱ्यांची आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसतानाही खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धसांनी दिली. धस म्हणाले, "एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला. त्याच दिवशी जीआर निघाला. हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सुचवलं होतं. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रीम देण्यात यावा, असा आदेश काढण्यात आला," असा आरोपही आमदार सुरेश धस यांनी केला.
अॅग्रोवनने सर्वात आधी कृषी निविष्ठा खरेदी डीबीटीला बगल देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. अलीकडेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील निविष्ठा घोटाळ्यावरून मुंडेंवर गंभीर आरोप केले. आता आमदार धस यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाकडे मोर्चा वळवला आहे.
धस म्हणाले, "नॅनो युरियामध्ये २१ कोटी २६ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला. डीएपीमध्ये ५६ कोटी ७६ लाख रुपये, बॅटरीमध्ये ४५ कोटी ४३ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला. तर कापूस साठवणूक बॅगमध्ये एक बॅग ५७७ रुपयांची असताना १२५० रुपयांनी खरेदी केली. १८० कोटी ८३ लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमूने बाहेर काढले." असा आरोपही धस यांनी केला.
यावेळी धस यांनी यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे नाव उघड केली. तसेच भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. धस म्हणाले, "या घोटाळ्यात रफीक नाईकवाडे मुख्य अॅक्टर आहेत. भांमरे आजही त्यांच्यासोबत आहेत. या चमूने फक्त कागदपत्र रंगवली आहे. लोकायुक्त कार्यालयाला देखील खोटी माहिती देण्यात आली. त्यामुळे मुंडे यांच्या काळातिल भ्रष्टाचाराची एसआयटी स्थापन करून चौकशी करा." अशी मागणी धस यांनी केली आहे.
कृषी खात्यातील या घोटाळ्याची कसून चौकशी करावी, यासाठी भारतीय किसान संघाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं होतं. परंतु ते पत्रही वाल्मिक कराड याने फाडून टाकलं होतं. कृषी विभागाला चॅलेंज करतो हे पत्र तुमच्याकडे आहे का? असं म्हणत धसांनी कृषी विभागाला आव्हान दिलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याचं उत्तर द्यावं, असंही धस म्हणालेत.
"भारतीय किसान सभेचं पत्र त्यांनी फाडून टाकलं. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी. सीबीआय, ईडी, एसीबी यांच्याकडे याबाबतची सविस्तर तक्रार मी करणार आहे. धनंजय मुंडे यांनी बदल्यांमध्येही १०० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. बदल्यांचे रेट कार्डही त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांकडे सापडले आहेत." असा गंभीर आरोप धस यांनी मुंडे यांच्यावर केला आहे.
दरम्यान, राज्यातील कृषी निविष्ठा घोटाळ्यावरून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.