
Water Conservation : गावशिवारातील पाणलोटनिहाय पाण्याच्या ताळेबंदाची माहिती ग्रामपंचायतीकडे असावा. ही माहिती समोर आली, की आपल्याला वर्षातून. किमान दोन वेळेच्या पाण्याचा ताळेबंद काढता येतो.
सर्वसाधारणपणे वर्षभरामध्ये किती पर्जन्यवृष्टी होते आणि त्यांची विभागणी.
मॉन्सूनपूर्व पावसाची नोंद.
मॉन्सूनच्या कालावधीमधील पावसाची नोंद.
मॉन्सून उत्तर कालावधीमधील पावसाची नोंद.
लघू सिंचन प्रकल्पांना प्राधान्य
प्रत्येक वेळेस मध्यम प्रकल्प, मोठे प्रकल्प सिंचन प्रकल्प हे निश्चित उपयुक्त ठरतीलच असे नाही. कारण मोठ्या प्रकल्पातून तसेच मध्यम प्रकल्पातून होणारे विस्थापन हे अनेक वर्ष प्रलंबित राहते. तसेच या प्रकल्पातून उपलब्ध असलेल्या जलसाठा हा प्रथमतः शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येतो.
परंतु कालांतराने त्याचे प्राधान्यक्रम बदलतात आणि शेतीच्या ऐवजी पिण्यासाठी त्याचा प्राधान्यक्रम ठरतो. या सर्व बाबी आपल्याला माहिती आहेत. म्हणून सर्वसाधारणपणे महाराष्ट्र राज्याची स्थिती पाहतात २० टक्के सिंचित क्षेत्र आहे आणि ८० टक्के भूभाग कोरडवाहू प्रदेशात मोडतो. त्यामुळे या ठिकाणी लघू सिंचन हाच एक उपाय शाश्वत ठरू शकतो.
पिण्याचे पाणी
पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रतिव्यक्ती ग्रामीण भागासाठी ५५ लिटर आणि शहरी भागासाठी १३५ लिटर असे प्रमाण विहित करून ठेवलेले आहे. सद्यःस्थिती पाहता यापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात पाणी लागते. हे लागणारे पाणी भूजलाच्या माध्यमातूनच येते. आज जरी ८० टक्के पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे भूजलावर अवलंबून आहेत असा ‘सीजीडब्ल्यूबी’चा अहवाल सांगतो.
नदीवरील उपसा प्रकल्प, मोठी धरणे, मध्यम प्रकल्प, विहिरी इत्यादीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, प्रत्येक गावाला पाणीपुरवठा करणारा मोठा किंवा मध्यम प्रकल्प असेलच असे नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधीला मतदारसंघातील प्रत्येक पाणलोट क्षेत्राची सर्वंकष माहिती असणे गरजेचे आहे.
नदीचा पालक
‘नदी माझी आहे आणि मी नदीचा पालक आहे’ हा भाव लोकप्रतिनिधींनी मनामध्ये असला पाहिजे. कारण देशभरात नदीविषयी अभ्यास करत असताना नदी विपन्नावस्थेत आहे हे ठळकपणे दिसून येते. नागरी भागामध्ये तर लोकप्रतिनिधींच्या यादीमध्ये नदी हा विषय दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये देखील विधानसभा आणि लोकसभा प्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमामध्ये नदी हा विषय दिसत नाही. नदीच्या पुनर्निर्माणासाठी आणि पूर्वस्थितीत नेण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. विधिमंडळातील प्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी ठरते.
आपल्या देशाने आणि राज्याने जलधोरण निश्चित केले आहे. परंतु नदी धोरण अथवा नदी नीती निश्चित केलेली आढळत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नदीची अवस्था ही बिकट झाली आहे. नदीची अवस्था बिकट होण्यामध्ये प्राधान्याने व्यक्तिगत स्तरापासून निर्माण होणारे प्रदूषके, रासायनिक प्रदूषण, सांडपाणी घनकचरा हे विक्राळ स्वरूप धरण करते आहे.
नदी केवळ आपल्या सर्वांच्या हक्काचे कचरा टाकण्याचे किंवा सांडपाणी टाकण्याचे ठिकाण आहे हे प्रत्येकाने निश्चितच करून टाकलेले दिसते, हे गैर आहे, हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. रासायनिक आणि वैयक्तिक प्रदूषणाचा संयुक्त प्रभावामुळे आपले आरोग्य,पशू आरोग्य आणि मातीचे आरोग्य बिघडले आहे.
नदी ही पवित्र आहे आणि पवित्र ठिकाणी आपण घाण कचरा अथवा गैरकृत्य करत नाही. प्रत्येक गावामध्ये कचरा टाकण्याची अथवा सांडपाणी निचरा करण्याचे निश्चित असे प्रणाली असणे आवश्यक आहे आणि ती नदीमध्ये कदापिही जाऊ नये याची काळजी घेणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य ठरते.
नद्यांचे विश्वस्त
लोकप्रतिनिधी हे किमान पाच वर्षांसाठीचे लोकांमधून निवडून गेलेले विश्वस्त असतात. यांनी नैसर्गिक संसाधनांची जपणूक आणि त्यामध्ये अधिक काही वाढ करून पुढे हस्तांतरित करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी लोकप्रतिनिधी स्वतःच या व्यवसायात गुंतल्याचे लक्षात येते त्यामुळे अशा गैरप्रकारांना वाव मिळतो असेही लक्षात येते.
देश, राज्य आणि आपल्या मतदारसंघाच्या व्यापक हितासाठी गैर गोष्टी टाळणे आवश्यक आहे. कारण निसर्गाची झालेली हानी भरून येण्यासाठी अनेक शतके जातील आणि दरम्यान होणारे नुकसान, लोकांची ससेहोलपट आणि होणारे स्थलांतर हे क्लेशदायक आहे, हे वास्तव आपल्या सर्वांना ज्ञात आहे.
जाहीरनाम्यात नदी असावी अग्रस्थानी
सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, की आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, त्याबाबींवर आपल्याला काम करावेच लागेल. तथापि मतदार संघाच्या काही समस्या, काही बलस्थाने आणि काही कमतरता आहेत. या सगळ्याची जाण आपल्याला असते, असायला हवी. मतदारसंघाच्या जाहीरनाम्यामध्ये नदी ही ठळकपणे येणे गरजेचे आहे.
शहरांमधील नद्यांचे वास्तव अत्यंत भीषण आहे तसेच काही निमशहरी आणि निमग्रामीण अशा दोलायमान अवस्थेत असलेल्या गावांमधून तर नद्यांची आणि स्वच्छतेची भयानक अवस्था आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे लोकशाही आणि घटनेने अमर्याद अधिकार दिले आहेत. त्याचप्रमाणे निधींची देखील तजवीज केली आहे. या सर्वांचा चतुराईने वापर केल्यास आपल्या मतदारसंघाची नदीचे आपण पालक म्हणून निश्चितच भूषणावह ठरावी.
नद्यांची समस्या
नदीच्या क्षेत्रामध्ये होणारे अतिक्रमण.
नदीच्या क्षेत्रामध्ये मधून होणारे गौण खनिजाचे (वाळू) उत्खनन.
मोठ्या प्रमाणावर होत असलेले रासायनिक आणि घरगुती प्रदूषण.
नदीच्या किनारी अनेक गावे वसली आहेत, लोकप्रतिनिधींना अशा प्रत्येक गावांची माहिती असणे गरजेचे आहे. नदी प्रदूषणाच्या समस्यांवर नेमक्या कोणत्या गावांमधून, कोणत्या नगरांमधून जास्त आहेत, याचा अभ्यास करावा. लोकप्रतिनिधींनी या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन त्या तत्काळ थांबवणे गरजेचे आहे. नदी किनाऱ्यावरील माती आणि नदीमधील वाळू यांचे उत्खनन ही एक प्रचंड मोठी समस्या झाली आहे. अनेक अवैध मार्ग यासाठी अवलंबले जातात. हे थांबवायचे असेल तर त्याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
कल्याणकारी राज्य व्यवस्था
प्रत्येक लोकशाहीमध्ये विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका असते. भारतीय संविधानानुसार विधिमंडळाचे कामकाज म्हणजे सरकार बनवणे, सरकारला योग्य प्रकारे वागायला लावणे आणि प्रसंगी सरकार बदलवणे सरकारी कामावर देखरेख ठेवणे, सरकारी कामात गैर प्रकार आढळल्यास त्याचा जाब विचारणे, इत्यादी कामे विधिमंडळाची असतात. सांप्रत विधिमंडळाची कामे वैधानिक, आर्थिक आणि टीकात्मक या तीन प्रकारात विभागता येतात. विधिमंडळाचे प्रमुख काम म्हणजे विधिनियम किंवा योग्य ते कायदे करणे हे होय. आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्याने राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वांगीण नियोजनाचा म्हणजे राज्याच्या सर्वांगीण अर्थव्यवहाराबाबतचा राज्य विधिमंडळाला विचार करावा लागतो. या सर्व बाबींची मध्यगा काढून लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका निश्चित करावी लागेल.
ग्रामपंचायतीमध्ये ही माहिती महत्त्वाची
संपूर्ण मतदार संघाचा नकाशा.
लोकसंख्या विषयी माहिती.
मतदार संघातील नदी खोरे नकाशा.
गावनिहाय सूक्ष्म पाणलोट नकाशा.
जलस्रोतांची माहिती.
मागील पन्नास वर्षांतील पर्जन्यमान.
तापमान, आर्द्रता, बाष्पीभवन, मातीचा पोत.
गावशिवारातील एकूण क्षेत्र.
लागवडीखालील क्षेत्र.
सिंचनाखालील क्षेत्र.
पशुधन संख्या.
व्यवसाय, उद्योग इत्यादी.
शिवारातील नद्यांची सद्यःस्थिती.
९७६४००६६८३, (माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.