Diwali Festival : दिवाळीच्या सणाच्या आठवणी

Diwali Holidays : महिनाभर आधी दिवाळीचे वेध लागलेले असायचे. कधी एकदाची सहामाही परीक्षा संपते असे होऊन जाई. परीक्षा संपली की दिवाळीची लगबग सुरु होई. शेतातली कामं वेळेत आवरून घेतली जात.
Diwali
DiwaliAgrowon
Published on
Updated on

भाऊसाहेब चासकर

Memories of Diwali : महिनाभर आधी दिवाळीचे वेध लागलेले असायचे. कधी एकदाची सहामाही परीक्षा संपते असे होऊन जाई. परीक्षा संपली की दिवाळीची लगबग सुरु होई. शेतातली कामं वेळेत आवरून घेतली जात.

सगळ्यात पहिले काम भुई घेणे असायचे. घर, ओसरी खोदायची. पाणी शिंपून माती भिजवायची. चिखल करायचा. चोपणीने चोप द्यायचा. सकाळ, दुपार, संध्याकाळ हलकं पाणी शिंपडून चोपणीने भुई बडवायची. बाभळीच्या शेंगांमधल्या बिया(याला आमच्या भागात दामुके म्हणतात!) दरवाजापाशी जमिनीत चिखलात रुतवून नक्षी तयार केली जात असे. भुई चोपण्याचा दिनक्रम चार आठ दिवस सुरू असायचा.

जवळपास सगळीच घरं भेंड्यात बांधलेली, दोन पाखी कौलारू घरं असायची. मातीच्या भिंती असल्याने त्या सारवायला लागत. 'सारव भिंती म्हणं कोनाडे किती?' ही म्हण ग्रामीण भागात यातून रूढ झाली. आधी भुई घेतली की चिकन मातीने भिंतीवर पडलेली टिचरं लिंपून घेतली जात. मग पोचाऱ्यानं भिंती सारवायच्या. भिंती सारवायला खास भुरकट माती चाळून आणायला लागायची. भुई घेतल्यावर शेणानं सारवलं की सुंदर दिसायची. पुढं काही महिने उद गळत नसे. पुढं काही महिने उलटले जी शेण पोपडे धरायचं. म्हणून भुई घ्यायला लागायची. काही हौशी लोक घरांच्या भिंतींना चुन्यात मोरपंखी रंग मिसळून देत असत.

गोधड्या धुणे हा एक दिवसभराचा जंगी कार्यक्रम असायचा. बैलगाडीत घालून गोधड्या नदीला किंवा ओढ्याला घेऊन जायच्या. भिजलेल्या जड गोधड्या धुवायला एकमेकींची मदत होई. धुतलेल्या गोधड्या नदीकाठी वाळायला घातल्या की ते रंगीबेरंगी कोलाज मनोहर दिसत असे. या सगळ्यात आम्हा पोरांची लुडबुड सुरू असायची.

Diwali
Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

बांबूच्या काड्या बांधून त्याला पेपर चिकटवून भलामोठा आकाशकंदील (तेव्हा त्याला आम्ही आगलदिवा म्हणत असू!) तयार करत असू. वसुबारसेच्या दिवशी 'दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी...' असं गाणं म्हणत घरोघरी जाऊन आम्ही मुलं तेल मागत असू. बहिणींना मुऱ्हाळी जाणे हा एक महत्त्वाचा हिस्सा असायचा. ग्रामीण भागात सगळीकडे हेच चित्र दिसत असे.

दिवाळीत बनवलेले लाडू आणि करंज्यांसारखे गोडधोड फराळ म्हणजे केवढा मोठा आकर्षणबिंदू! आई बेसन पिठाच्या चानक्या तळून त्या चुरून त्यात सगळी साखर टाकून लाडू बनवायची. हे फराळ मर्यादित असले तरी त्यांची लज्जत काही औरच होती! टेस्ट दीर्घ काळ जिभेवर रेंगाळत असे. खेरीज वर्षभरात एकदाच खायला मिळत म्हणून त्याची नवलाई, अपूर्वाई असायची. अलीकडे मिठाईच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या रेडिमेड खाद्यपदार्थांना त्या काळातल्या लाडू आणि करंज्यांची सर येणं कदापि शक्य नाही...

Diwali
Diwali Article : महिलांची कमाई अन् श्रमिक बाजारातील उत्कृष्ट प्रगती

नवे कपडे घालून आकडत मकडत पोरं उगीचच गल्लीतून दोन चक्कर टाकून यायची... पिस्तुलमध्ये टिकल्याचे रोल घालून आवाज काढणे अत्यानंदाचा विषय असे. सुरसुऱ्या आणि लवंगी फटाकड्या वाजवण्यातली मौज काही निराळीच होती... गरिबी होती, अभाव होता. संसाधने नव्हती. मात्र जगण्यात आनंद मोठा होता.

हल्ली हल्ली दिवाळी येते. पण वर्षातला एक मोठा सण म्हणून वेध लागत नाहीत. तितकं अप्रूप राहिलं नाही. दरवर्षी दिवाळी येते. खरं तर दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव. मात्र इथं तेल आणि वातीची गरज नसलेल्या मेणबत्तीसारख्या पणत्या आल्यात. चायनीज माळा घरांवर लावल्या जातात. प्लॅस्टिकचे रेडिमेड आकाश कंदील टांगले जातात. रंगीबेरंगी पणत्या आल्यात. दारात रांगोळी काढली जाते. किराणा, सामान आणायचं. आचाऱ्याकडून काही गोडधोड खाद्यपदार्थ बनवून घ्यायचे. मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायची. उपचार होत चाललाय... रोषणाईचा झगमगाट आहे, पक्वान्नांचा घमघमाट आहे. फोटो, व्हिडिओ, रिल्स चा तडका आहे.... मात्र तीन साडे दशकं आधी दिवाळी साजरी करण्यात होती ती गंमत आता उरली नाही... हे वास्तव नजरेआड करता येत नाही... छोट्या छोट्या गोष्टींतला मोठा आनंद शोधणं, तो घेणं बंद होत चाललंय.

भारतीय संस्कृतीत खासकरून कृषी संस्कृतीत सणांना मोठं महत्त्व होतं. हळूहळू ही संस्कृती लयाला गेली. सांस्कृतिक अंगांनं अंधानुकरण आणि 'सांस्कृतिक गुलामगिरी' वाढत चाललीय. करवा चौथसारख्या काही नव्या गोष्टी आल्या आहेत. नवरात्रीत दांडियासारखे नवे उत्सव साजरे होऊ लागलेत.

आजचा जमाना जागतिकीकरणाचा आहे. माहिती-तंत्रज्ञान आल्यानंतर झपाट्याने जगाचे सपाटीकरण होत गेले. जाहिरातींचा बेफाम मारा सुरु झाला. जगण्यावर बाजार प्रभाव टाकू लागला. जीवनशैली बदलत गेली. माणसाच्या आनंदाच्या परिकल्पना वेगानं बदलत गेल्यात. माणूस ग्राहक बनवला. पैसा मोठा झाला. माणूसपण हरवत चाललंय. समाज आत्मकेंद्रित बनत चाललाय. सणावाराला एकत्र येणं, गुण्यागोविंदानं आनंद वाटून घेणं कमी होत गेलं. सगळं रेडिमेड शोधायच्या नादात सणावारातले, पर्यायानं जगण्यातले सेंद्रीय तत्त्व (नैसर्गिकता) हरपत गेले. अर्थात स्मरणरंजनात अडकून, नाराजीचा राग आळवण्यात आता काही हशील नाही. काळाचा महिमा अगाध असतो...

तळटीप: दिवाळीत बनवलेल्या रव्याच्या लाडवाच्या अनेकानेक सुरस कथा आहेत. माझा एक मित्र दिवाळीच्या सुट्टीनंतर रूमवर आला की लाडू फोडण्यासाठी खास व्यवस्था करत असे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com