ॲग्रोवन वृत्तसेवा
Mango Production : सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पडत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागांतील आंबा हंगामाला पूर्णविराम मिळाला असून, किनारपट्टीच्या तालुक्यातील आंबा हंगामदेखील अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात या वर्षी किनारपट्टी भागात मार्चपासून आंबा हंगाम सुरू झाला. परंतु नियमित हंगाम हा एप्रिलपासून सुरू झाला. पहिल्या टप्प्यात अतिशय कमी प्रमाणात आंबा बाजारपेठेत दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उत्पादन मोठ्या प्रमाणात आले.
या वर्षी फुलकिडींच्या प्रादुर्भावाने आंबा बागायतदार मेटाकुटीला आले. फुलकिडीपुढे विद्यापीठाने शिफारस केलेली कीटकनाशके निष्प्रभ ठरली. मात्र बागायतदारांनी विविध उपाययोजना करीत आंबा उत्पादन घेतले. किनारपट्टीच्या देवगड, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांत आंब्याचे चांगले उत्पादन आले. परंतु कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि वैभववाडी तालुक्यांतील पूर्वपट्ट्यात आंबा हंगाम मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला.
आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्वमोसमी पावसाचा तडाखा या भागाला बसला आणि या भागातील आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आला. जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील आंबा हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे. परंतु देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या भागांत अजूनही आंबा हंगाम सुरू आहे. या तालुक्यांमध्ये एक, दोन वेळा पाऊस झाला. परंतु झाडांवर मोठ्या प्रमाणात आंबा शिल्लक आहे. त्यामुळे या भागातील आंबा आता कॅनिंगला जात आहे. पुढील आठ दिवसांत या भागातील आंबा हंगामदेखील संपण्याची शक्यता आहे. सध्या कॅनिंगच्या आंब्याला देखील प्रतिकिलो ४५ रुपये दर मिळत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.