
Sugarcane Crop Management : राज्यात गेल्या काही दिवसांत तापमानात वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत काही विशिष्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात येणारी संभाव्य घट कमी करणे शक्य आहे. राज्यातील ऊस उत्पादकता एकरी ३५ टनांच्या जवळपासच आहे. ती आणखी कमी होऊ नये यासाठी आपत्कालीन पीक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
ऊस हे उष्ण कटिबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान ८०-९० टक्के आर्द्रता, प्रखर सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते. तथापि, कडक उन्हाळा, तसेच पाऊस काळातील (जून-जुलै) कमी /नगण्य पाऊसमान यामुळे पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होवू शकतो.
पिकाच्या काही महत्त्वाच्या शरीरक्रियाशास्त्रीय आणि जीवरासायनिक क्रियांवर परिणाम होऊन बाष्पीभवनाचा वेग वाढतो. पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो. त्यामुळे या काळात योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येते. पाण्याच्या ताणामुळे तीव्रतेनुसार ऊस उत्पादनात सरासरी १५ ते ५० टक्के लक्षणीय घट येते.
तापमानवाढीचे दुष्परिणाम
अवर्षण काळात तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो.
जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होते.
मुळाच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळांव्दारे पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते.
हरितद्रव्यांचे प्रमाण घटल्यामुळे पाने पिवळी पडू लागतात.
पूर्ववाढ आणि जोमदार वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे कांड्यांची लांबी, जाडी कमी होऊन वजनात घट येते.
तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशीचे प्रमाण वाढते.
साखर चयापचय /क्रियांवर परिणाम होऊन निर्मिती व उतारा घटतो.
पाण्याचा तीव्र ताण बसल्यास उसाची वाढ खुंटते व कधी कधी सरळ उंच वाढण्याऐवजी डोळे फुटून पांगशा फुटतात.
उपाययोजना
ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातीचा लागवडीसाठी प्राधान्याने वापर करावा.
एक आड सरीतून पाणी द्यावे.
उभ्या पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी. पीक हे तणविरहित ठेवावे.
पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवड्यांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी ५ ते ६ टन पाचटाचे आच्छादन करावे.
आडसाली, पूर्वहंगामी
या हंगामातील उसामध्ये पाण्याचा ताण पडल्यास एका आड एक सरीतून पाणी द्यावे. खालील पक्व पाने काढून त्याचे सरीमध्ये आच्छादन करावे.
पट्टा पद्धतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पीक तणविरहित ठेवावे.
सुरू हंगाम
सुरू उसाला एका आड एक सरीतून पाणी द्यावे. पीक तणविरहित ठेवावे. बाष्पीभवन कमी करण्यासाठी ऊस पाचट सरीमध्ये आच्छादन म्हणून वापरावे. ज्या उसाची बांधणी झालेली नाही, अशा उसास बांधणीच्या वेळेस शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त पालाश खताची मात्रा द्यावी.
पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर २१ दिवसांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी.
पीक तणविरहित ठेवावे. ज्या ठिकाणी पट्टा पद्धतीने लागवड केली आहे, अशा ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
खोडवा
एका आड एक सरीतून पाणी द्यावे. खोडव्यामध्ये पाचट आच्छादन म्हणून वापरावे. खोडव्यास पहारीच्या साह्याने पालाशची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त द्यावी. दर २१ दिवसांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी. पीक तणविरहित ठेवावे.
पट्टा पद्धतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
डॉ. राजेंद्र भिलारे, ९८२२०७२४२८
(ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.