Summer Citrus Orchard Management: तीव्र उन्हाळ्यात बागेत करावयाचे व्यवस्थापन

Summer Heat Stress in Citrus: उन्हाळ्याच्या तीव्र तापमानामुळे संत्रा, मोसंबी व लिंबू फळबागांमध्ये झाडांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर मात करण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
Summer Crop Tips
Summer Crop TipsAgrowon
Published on
Updated on

डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर

Summer Farming Tips: उन्हाळ्यात तीव्र उष्ण तापमानामुळे संत्रा, मोसंबी व लिंबू फळबागांमध्ये नवीन आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहाराची लहान फळांची फळगळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे विविध विपरीत परिणाम दिसून येतात. या परिणामांची दाहकता कमी करण्यासाठी ओलित व्यवस्थापनाविषयी माहिती घेऊ.

विकसित झाडांचे नियोजन

१. पाण्याची कमतरता असणाऱ्या फळबागांमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी उन्हाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी झाडांभोवती सेंद्रिय पदार्थांचे किमान १० सेंमी थराचे आच्छादन करावे. यासाठी गवत, पालापाचोळा, कुटार, गव्हांडा, तणस यासारखे पिकांचे अवशेष वापरता येतात. किंवा काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपर (१०० मायक्रॉन) आच्छादन करून घ्यावे.

याचे फायदे

झाडाजवळ ओलावा टिकून राहतो.

या दोन्ही प्रकारच्या आच्छादनामुळे सूर्यप्रकाशाअभावी तणाची वाढ होत नाही.

जमिनीचे तापमान नियंत्रित राहते.

जमिनीत ओलावा, सावली टिकून राहिल्याने उपयुक्त जिवाणूंची वाढ होते.

आच्छादनासाठी वापरलेले सेंद्रिय पदार्थ कालांतराने कुजून उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार होते.

जमिनीची धूप कमी होते.

आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळ्यांतील अंतर वाढविता येते.

सेंद्रिय आच्छादनाचा वापर करताना सोबतच प्रति झाड २-३ किलो गांडूळ खत द्यावे. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

Summer Crop Tips
Summer Crop Management: उन्हाळ्यात पिकांसाठी करा योग्य आच्छादन

२. उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यास बहर घेण्याचे टाळावे. आंबिया बहार न घेता मृग बहाराचे नियोजन करावे, कारण मृग बहर करिता पावसाळ्यात पावसाचे पाणी मिळते. थोड्याफार प्रमाणात ओलीत व्यवस्थापन करून बहर घेता येतो. मात्र अंबिया बहरास उन्हाळ्यात मुबलक पाणी लागते. पाण्याच्या कमतरतेमध्ये ते देणे शक्य होत नाही. बहर अडचणीत येतो.

३. हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही भारी जमिनीपेक्षा कमी असते. हलक्या जमिनीला वरचेवर पाणी द्यावे लागते. त्यामुळे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याच्या पाळ्यांचे अंतर बसवावे.

४. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये झाडाच्या मुळाजवळच थेंब थेंब पाणी पोचवले जाते. त्यामुळे पाटातून पाणी वाहताना होणारा पाण्याचा अपव्यय टाळला जातो. या पद्धतीमध्ये पाणी मोजून देता येते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी देताना दररोज बाष्पोत्सर्जनाच्या ८० टक्के इतकेच पाणी द्यावे. ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पाणी बचत साधते. ठिबक पद्धतीसोबत खते देण्याची यंत्रणा नक्कीच बसवून घ्यावी. त्यामुळे रासायनिक खतेही मोजून देता येतात. यात खतांची ३० टक्क्यांपर्यंत बचत होते.

५. उष्णतेमुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास खोडावरील साली तडकण्याचे प्रमाण वाढू शकते. अशावेळी झाडाचे बुरशीजन्य व इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुरुवातीस खोडाला एक ते दीड मीटर उंचीपर्यंत बोर्डो मिश्रण लावावे. बोर्डो पेस्ट लावल्याने खोडाचे तापमान कमी राहण्यास व सूर्यकिरण परावर्तित होण्यास मदत होते.

६. उष्णतेमुळे झाडातील पाणी पर्णोत्सर्जनाने अधिक प्रमाणात हवेत उडून जात असल्याने झाडे निस्तेज व मलूल पडतात. पर्णोत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी उन्हाळ्यात फळबागेवर बाष्परोधक केओलिन (२ टक्के) किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ टक्के तीव्रतेची फवारणी करावी. केओलीनची फवारणी हलके ओलीत केल्यानंतर करावी.

७. पाणी उपलब्ध असल्यास आंबिया बहराची फळे टिकून ठेवण्यासाठी ओलित सुरू ठेवणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनाची सोय असल्यास संत्रा व मोसंबीच्या १० वर्षावरील झाडांना १६० ते १९८ लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे.

लिंबूफळांच्या १० वर्षावरील झाडांना ठिबक सिंचनाद्वारे १४४ ते १७८ लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे.

ठिबक सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी दांडाने ७ ते ८ दिवसांनी पाणी पुरवठा करावा. झाडाचे ओळीमध्ये (दोन्ही बाजूला) दांड ओढावे. आळीपाळीने दांडात पाणी सोडावे. किंवा गोलाकार आळ्याचे दोन भाग करून एकावेळी अर्ध आळे पाणी द्यावे.

Summer Crop Tips
Citrus Crop Disease Management : फायटोप्थोरा, कोलेटोट्रिकममुळे होणाऱ्या फळगळचे व्यवस्थापन

८. बागेत आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी स्प्रिंकलर चालू ठेवावे. स्प्रिकंलरचे रायझर काढून नोझल जमिनीलगत ठेवावे.

९. ओलिताच्या पाण्याचे खूप दुर्भिक्ष असल्यास विकसित झाडाच्या विरुद्ध दिशेला मुख्य खोडापासून ४ ते ५ फूट दूर अंतरावर २ ते ३ फूट खोल व १ फूट रुंद व्यासाचे खड्डे करून घ्यावते. त्यामध्ये पाणी भरावे. यामुळे उपलब्ध पाण्याचे कार्यक्षम वापर होऊन फळझाडांचे संरक्षण होते.

नवीन कलमांची, रोपांची निगा

प्रखर उन्हामुळे मागील वर्षी लागवड केलेल्या कलमांची, रोपांचे कोवळे शेंडे सुकणे, पाने गळणे असे परिणाम दिसून येतात. हे टाळण्यासाठी पुढीलपैकी शक्य ते उपाय करावेत.

१. रोपांच्या अवतीभवती किमान २ ते ३ फूट परिघामध्ये सेंद्रिय पदार्थांचा १० सेंटीमीटर थर देऊन आच्छादन करावे. उदा. गवत, पालापाचोळा, कुटार, गव्हांडा, तणस इ. किंवा

२. रोपांच्या आसपास २ फूट परिघामध्ये गोलाकार बोरू बी पेरावेत. बोरूची झपाट्याने वाढत होऊन सभोवताली सावली राहते. परिणामी तीव्र उन्हापासून व उष्ण वारा यापासून संरक्षण मिळते. किंवा

३. रोपांच्या तिन्ही बाजूने त्रिकोणात बांबू रोवून हिरव्या शेडनेटचा मांडव करावा. किंवा

४. बांबू किंवा कामठ्यांना दक्षिण व पश्चिम बाजूंने येणाऱ्या उन्हापासून संरक्षणासाठी तुराट्यांचा कुड करून घ्यावा.

५. एक ते तीन वर्षाच्या नवीन कलमांच्या बुडाशी छोटा पाण्याचा माठ ठेवून पाणी देण्याची एक पद्धत आहे. यात झाडाच्या भोवती एक मडके जमिनीत अर्धा भाग पुरून ठेवले जाते. त्यामध्ये पाणी टाकून ठेवल्यास सावकाश पाझरत एक आठवडाभर ओलावा तयार होतो. पाझरण्याचे प्रमाण कमी असल्यास मडक्याच्या बुडाशी छोटे छिद्र करून कापडाची वात किंवा बोळा बसवावा. त्यामुळे मडक्यातील पाणी संथ गतीने पाझरून मुळांना मिळते.

६. उन्हामुळे बाष्पीभवन व पर्णोत्सर्जनाचा वेग अधिक असतो, त्यामुळे कलमांची पाने लवकर कोमेजतात. अशावेळी पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ किलो प्रति १०० लिटर पाणी या द्रावणाची २० ते २५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. यामुळे पानांतील पर्णोत्सर्जनाचा वेग कमी होतो. पानांतील अन्न निर्मितीची क्रिया मंदावत नाही.

उष्णतेमुळे होणारी फळगळ रोखण्यासाठी...

तापमान वाढ व उष्ण वारा यामुळे लिंबूवर्गीय फळबागेमध्ये फळगळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता २-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक युरिया (१ किलो) प्रति १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून यांची फवारणी करावी.

फळवाढीकरिता जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ किलो प्रति १०० लिटर पाणी किंवा जिबरेलिक अॅसिड १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) ८०० ग्रॅम अधिक मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट (०:५२:३४) ५०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी यांची आलटून पालटून फवारणी करावी.

चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

लहान फळे यावर काळे डाग पडून गळत असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड* ३० ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

आंबिया बहरातील फळझाडांना नत्राची अर्धी मात्रा दिलेली नसल्यास त्वरित द्यावी.

संत्रा व लिंबूमध्ये मृग बहर घेण्याकरिता झाडे मे महिन्यात ताणावर सोडावी. झाडाला ताण जमिनीच्या मगदुरानुसार ३० ते ५० दिवसांकरिता द्यावा. ताण योग्य प्रकारे न बसल्यास (अवेळी आलेल्या पावसामुळे) ताणाचे कालावधीत झाडावर क्लोरमेक्वाट क्लोराईड * २००० पीपीएम (२ मिलि प्रति लिटर पाणी) संजीवकाची फवारणी करावी.

डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७

डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२

(भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प - फळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com