
Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॉट करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ८२ दिवसांत पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी दिली.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेणाऱ्या घरांची एकूण संख्या ६ डिसेंबर रोजी ७१ हजार ४३७ होती व त्यांची एकूण क्षमता २८३ मेगावॉट होती. शंभर दिवसांच्या मोहिमेत एकूण घरांची संख्या १.२५ लाख व एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॉट करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.
राज्यात २६ फेब्रुवारी रोजी योजनेच्या लाभार्थी घरांची संख्या १ लाख २८ हजार ४७० व एकूण क्षमता ५०० मेगावॅट झाली होती. या योजनेचे शंभर दिवसांचे उद्दिष्ट ८२ दिवसांत पूर्ण झाले. या आधी महावितरणने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत बसविण्यात आलेल्या पंपांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक करण्याचे शंभर दिवसांचे उद्दिष्ट साठ दिवसांत पूर्ण केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली होती. योजना सुरू झाल्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत राज्यात ७१ हजार ४३७ हजार घरांना लाभ झाला होता तर त्यानंतर शंभर दिवसांच्या मोहिमेत ८२ दिवसांत ५७ हजार ०३३ घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यात आले.
योजनेत आतापर्यंत राज्यातील लाभार्थी कुटुंबांना एकूण ८०० कोटी रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या खात्यात थेट देण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॉटला ३० हजार रुपये, दोन किलोवॅटला ६० हजार रुपये आणि तीन किलोवॉटच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते.
जास्तीत जास्त अनुदान ७८ हजार रुपये आहे. महावितरणतर्फे ग्राहकांना नेट मीटर मोफत दिला जातो. छतावरच्या सौर ऊर्जा प्रकल्पात घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीजबिल शून्य होते. गरजेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.
योजनेत नागपूरचा प्रथम क्रमांक
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यामध्ये राज्यात नागपूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. नागपूरमध्ये आता लाभार्थी घरांची संख्या २१,०२७ झाली आहे. नागपूरनंतर पुणे (९,८७५ ), जळगाव (९,४८९), छत्रपती संभाजीनगर (८,८१४), नाशिक (८,५५८ घरे), अमरावती (७,११९), कोल्हापूर (६२९१ घरे), धुळे (४,१८७ ) आणि सोलापूर (४,००७ ) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.