
Pune News : कृषी क्षेत्रात अत्याधुनिक वापराबरोबरच हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आत्मसात करण्यासाठी राज्यात सहा विभागांमध्ये सहा सेंटर फॉर इनोव्हेशन इन डिजिटल ॲण्ड सस्टेनेबल ॲग्रीकल्चर (सीडसा) प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी येत्या ३० जून रोजी मांडण्यात येणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ९० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे आश्वासन अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकेथॉनचे उद्घाटन मंत्री पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. १) झाले.
या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, चेतन तुपे, बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी अजित पवार म्हणाले, ‘‘शेतकरी विविध प्रयोग करून शेती करत आहेत. आता तरुणांना कृषी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतीत येऊन शेती शाश्वत झाली पाहिजे. यासाठी राज्य सरकार शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देत आहे.
यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात पुढील दोन वर्षांसाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. मात्र शेतकऱ्यांची वाढत्या उत्सुकतेमुळे आता हे ५०० कोटी एका वर्षातच खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. शाश्वत शेती करताना, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरांवर नियंत्रण आणत ग्राहकांना देखील दर्जेदार शेतीमाल मिळाला पाहिजे यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. यासाठीच्या तंत्रज्ञान वापराला सरकारचे पाठबळ आहे.’’
कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, ‘‘भविष्यात कृषी क्षेत्रात मनुष्यबळा अभावी अडचणी निर्माण होणार आहेत. ही अडचण समजून कर्नाटकमध्ये ४० आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी एकत्र येत, कृषी क्षेत्रातील मानव विरहित अवजारे आणि तंत्रज्ञान विकसित करत आहेत. यामध्ये मानवरहित ट्रॅक्टर, मानवरहित ड्रोन आदी विविध तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
या सर्व तंत्रज्ञानाच्या वापरातून महाराष्ट्रातील शेती संरक्षित, सुरक्षित आणि शाश्वत करण्याचे धोरण आहे. यासाठी या ॲग्रीथॉनच्या माध्यमातून नवनवीन संशोधन शेतीत येईल. यातून शाश्वत शेती आणि स्वावलंबी शेतकरी होईल, असा विश्वास आहे. या वेळी कृषी आयुक्त मांढरे, जिल्हाधिकारी डुडी आणि डॉ. राजाराम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
ॲग्री हॅकेथॉन शेतीला दिशा देणारी ठरेल
एखाद्या समस्येवर मात करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना एकत्रित आणून समस्येचे निराकरण केले जाते. याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हॅकेथॉन म्हणतात. याच धर्तीवरील कृषी क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी होत असलेली पहिली हॅकेथॉन ही कृषी क्षेत्राला नवसंजीवनी आणि भारतीय कृषी क्षेत्राला जागतिक दिशा देणारी ठरेल, असा आत्मविश्वास या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
शेतीवर हवामान बदलाचे संकट
कृषी क्षेत्रावर हवामान बदलाचे मोठे संकट आहे. हे आपण नुकत्याच झालेल्या पावसाने अनुभवले आहे. मे महिन्यात कधी पाऊस पडत नव्हता. मात्र जूनची सरासरी मे मध्येच भरून काढली. आमच्या बारामतीमध्ये सरासरी १४ इंच पाऊस पडतो. तो पाऊस मे महिन्यातच १३ इंच होऊन गेला. अशा हवामान बदलांच्या संकटात शेती आणि शेतकरी सापडला आहे. तंत्रज्ञान वापरातून शेती शाश्वत करण्याचे प्रयत्न असल्याचेही अजित पवार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.