
Kisan Sabha Protest : राज्यात ६ फेब्रुवारीपासून सरकारने सोयाबीन खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. किसान सभेने यावर आक्रमक भूमिका घेत बुधवारी (ता.१२) अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारने सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदत वाढ देऊन संपूर्ण खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र चालू ठेवावे. संपूर्ण सोयाबीन किमान हमीभावानेच खरेदी करा अन्यथा भावांतर योजनेतून फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. गेल्या दोन महिन्यापासून खरेदी करत असलेल्या सोयाबीनचे थकीत बील तात्काळ देण्यात यावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अजय बुरांडे यांनी हमीभाव खरेदी मुदत आणि भावांतर योजनेसाठी शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा विश्वास व्यक्त केला. बुरांडे म्हणाले, "शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद करण्याच्या निर्णयातून या सरकारने थेट शेतकऱ्यांच्या लुटीलाचं संमती दिलेली आहे. हे शेतकऱ्यांचे शोषण शेतकरी आणि शेतकऱ्यांची तरुण पोरं सहन करणार नाहीत. आम्ही हा लढा व्यापक करून या सरकारला संपूर्ण सोयाबीन हमीभावाने खरेदी करायला किंवा भावांतर योजनेअंतर्गत फरक देण्यास भाग पाडू. आता हे आंदोलन शेतकऱ्यांची पोरं हातात घेतील असा आम्हाला विश्वास आहे." असा इशाराही बुरांडे यांनी दिला.
बीड जिल्ह्यात ६ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी केलेल्या ४४ हजार ७४४ पैकी केवळ २० हजार ९६९ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केलं. त्यामुळे साधारण ५० टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन घरात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र दिवाळं निघत असल्याच्या स्थितीकडे किसानसभेने प्रसिद्धी पत्रकात लक्ष वेधलं आहे.
खरेदी बंद केल्यामुळे सोयाबीन खाजगी व्यापारी खरेदी करण्यासाठी ३ हजार ८०० रुपयांचा प्रतिक्विंटलचा डर देत आहेत. हमीभावापेक्षा १ हजार १०० रुपयांनी कमी किमतीत व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत. शेतकरी मात्र मेटाकुटीला आले आहेत. सरकारी खरेदीला मुदत मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु राज्य पणन मंत्र्यांनी सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांच्या संयमावर घाव घातला गेल्याचं किसान सभेने पत्रकात सांगितलं आहे.
पुढे बुरांडे म्हणाले, "एवढ्यावरच हे शोषण न थांबता ज्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यापासून शासकीय खरेदी केंद्रावर आपले सोयाबीन विक्री केले आहे, त्यांचे बिल अद्याप देखील या सरकारने अदा केलेले नाही. आणि त्यामुळे खरेदी झालेल्या शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे." असंही बुरांडे यांनी सांगितलं.
यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड उत्तरेश्वर इंगोले, रवींद्र देवरवाडे, जगन्नाथ घाळे, सय्यद खुर्शीद, आत्माराम पवार, अॅड शिवाजी कांबळे मस्के, राष्ट्रपाल पाटोळे, मुक्तार भाई, व्यंकटेश देशमुख इत्यादी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.