
Kolhapur News : पावसाने यंदा शेती व्यवसायावर संकट निर्माण केलेले असताना ज्या शेतकऱ्यांनी वीजपंपाच्या साहाय्याने भाताच्या तरव्यांची पेरणी केली, त्यांच्यासाठी हा पाऊस फायद्याचा ठरला आहे. तरवे तरारून आल्याने आणि शेतात चिखल करण्यासाठी पुरेसे पाणी निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भातरोप लावणीला सुरुवात केली आहे.
जून महिन्यातच हंगाम साधला जात असल्याने पुढच्या काळात चांगला पाऊस झाल्यास उत्पादनावरही परिणाम होणार आहे. यावर्षी खरीप हंगामपूर्व मशागतीसाठी वळीव झालाच नाही. मे महिन्याच्या अखेरीला तो इतका बरसला की, शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे पेरणीसाठी शेत तयार करता आले नाही. भाताच्या तरव्यासह नाचणी, भुईमूग, कडधान्य पिकांच्या पेरणीत व्यत्यय आला.
मात्र, ज्या शेतकऱ्यांनी वळीव पावसाची वाट न बघता वीज पंपाच्या साहाय्याने वावरात पाणी सोडून शेत तयार केले आणि तरवे टाकले. त्यांच्यासाठी या पावसाने अनुकूलता तयार केली आहे. सुमारे २० दिवसांपूर्वी टाकलेले तरवे तरारून आले आहेत. वावरात चिखल तयार करण्यासाठी पुरेसे पाणी झाल्यामुळे अनेकांनी रोप लावणीला सुरुवात केली आहे.
गावातील बहुतांश शेतकऱ्यांचे तरवे लावणीला येण्यासाठी अवधी असल्याने ज्यांनी रोप लावणी सुरू केली आहे, त्यांना मजूर मिळणे सोपे झाले आहे. जून महिन्याच्या अखेरीला लावणी झाल्यास पुढे जुलै व ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्यास पीकवाढीवर आणि उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होतो.
अनेकदा लवकर लावण केलेले भात लवकर कापणीला येते आणि त्या वेळी पाऊस असल्यास नुकसानीला सामोरे जावे लागते. काही वर्षांत असे प्रसंग आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वीज पंपाच्या साहाय्याने तरवे टाकण्याची पद्धत बंद केली. यावर्षी ज्यांनी लवकर तरवे टाकले त्यांच्यासाठी पावसाने अनुकूल वातावरण तयार केल्याने हंगाम लवकर साधणार असल्याचे समाधान आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.