Jivant Satbara: ‘जिवंत सातबारा’ मोहिमेची दखल; शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल!
Buldana News: शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या सातबारावरील नोंदी अपडेट करण्यासाठी जिल्ह्यातील चिखली तालुक्यात राबवलेल्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेची सर्वत्र दखल घेण्यात येत आहे. सुरुवातीला ही मोहीम जिल्हाभर राबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले. आता शासनस्तरावरही मोहिमेची माहिती घेण्यात आली आहे. महसूल खात्याने या बाबत माहिती घेतली. यामुळे चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांचे कौतुक होत आहे.
शेतजमिनीच्या मालकाचा मृत्यू झाल्यानंतर वारसाहक्काने संबंधित मालमत्ता मृताच्या वारसांच्या नावे होते. यासाठी वारसांना आपल्या नावांची नोंदणी करण्यासाठी विविध कार्यालयात हेलपाटे घ्यावे लागतात. वेळेवर काम होत नसल्याने कधी कधी मनस्ताप व आर्थिक फटकाही सहन करावा लागतो.
वारसा नोंदीत अडचणी येतात. ही प्रक्रिया दीर्घ स्वरूपाची राहते. बऱ्याचवेळा प्रकरणे अडकून पडलेले राहतात. शेतकऱ्यांना याची सर्वाधिक झळ सोसावी लागते. सातबारावर नोंद नसल्याने पीएम किसान, पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड, ॲग्रीस्टॅक, तसेच कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभही मिळू शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी चिखली तहसीलदार संतोष काकडे यांच्या पुढाकारात तालुक्यात मृत खातेदारांचे वारस लावण्यासंबंधीच्या अडचणी सोडवत नोंदी करण्यासाठी ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्यात आली होती. याद्वारे तालुक्यातील १५९ गावांत १४८७ मयत नोंदी आढळून आल्या. त्यापैकी ५०२ प्रकरणात वारस फेरफार प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
यासाठी मोहिमेअंतर्गत मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, सरपंच/ पोलिस पाटील यांचा वारस दाखला, वारसाबाबत प्रतिज्ञालेख, तलाठी/ग्रामसेवक यांचा स्थानिक वारस चौकशी अहवाल आदी कागदपत्रे घेऊन मंडळ अधिकारी/ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर पुढील कार्यवाही होऊन सातबारावर नोंदी घेण्यात आल्या. यासाठी नियोजन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनापासून मोहीम सुरू झाली. २६ ते ३१ जानेवारी दरम्यान ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या साझा अंतर्गत मयत खातेदारांची यादी तयार करणे, १ ते १० फेब्रुवारी काळात वारसासंबंधी कागदपत्रांचे ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सादरीकरण केले.
आतापर्यंत पाचशेवर सातबारा दुरुस्ती
या मोहिमेत चिखली तालुक्यातील ११ महसूल मंडलांमध्ये गावोगावी मयत खातेदारांचा शोध घेतला असता सुमारे १४८७ खातेदार आढळून आले. त्यापैकी ५०२ खात्यात वारस फेरफार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता उर्वरित ९८५ खातेदारांची ही प्रक्रिया सुरू आहे. वारस फेरफार घेतलेल्यांमध्ये मंडलनिहाय विचार केल्यास अमडापूरमध्ये १५, उदयनगर १७, कोलारा १२५, चांधई २२, चिखली ४३, धोडप २८, पेठ ४१, मेरा खुर्द ३६, शेलगाव आटोळ १५९, हातणी १६ अशा एकूण ५०२ सुधारित नोंदी झाल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.