Ratnagiri News : वातावरणातील बदलांसह पूर्वमोसमी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून आंबा, काजू आदी फळांसह भात, नाचणी शेतीचे नुकसान होत आहे. तरीही जिल्ह्यात आंबा, काजू फळांसह भाजीपाला पिकाखाली येणारे जमीन क्षेत्र कमी झालेले नाही.
गेल्या दहा वर्षांत फळे, भाजीपाल्याचे क्षेत्र ७ टक्क्यांनी वाढले आहे. त्याचवेळी भात शेती ३ टक्क्यांनी तर नाचणी पिकाखालील क्षेत्र २ टक्क्यांनी कमी झाले आहे. शेती क्षेत्र कमी झाल्याने लागवडीखालील क्षेत्रही ४ हजार ५४ हेक्टरने घटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी ७२ टक्के जमीन जंगलव्याप्त, २७ टक्के शेतीला उपलब्ध नसलेले, ४० टक्के लागवड न केलेले किंवा पडीक क्षेत्र आहे. सुमारे ३२ टक्के जमीन कसलेली आहे. जिल्ह्यात २०२२-२३ च्या कृषी विभागाकडील नोंदीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्र २ लाख ६७ हजार ७५० हेक्टर आहे.
हेच लागवडीखालचे क्षेत्र २०१२-१३ मध्ये म्हणजे दहा वर्षांपूर्वी २ लाख ७१ हजार ८०४ हेक्टर होते. दहा वर्षांपूर्वी भात शेतीखाली २६ टक्के तर नाचणी पिकाखाली ६ टक्के क्षेत्र होते. फळे आणि भाजीपाला पिकाखाली ६४ टक्के क्षेत्र होते.
दहा वर्षांनंतर तांदूळ पिकाखालचे क्षेत्र ३ टक्क्यांनी कमी होऊन २३ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. नाचणी पिकाखालचे क्षेत्र २ टक्क्यांनी घसरून ४ टक्क्यांवर आले आहे. फळे व भाजीपाला पिकाखालील दहा वर्षांपूर्वीचे क्षेत्र ६४ टक्के होते ते ७ टक्क्यांनी वाढून ७१ टक्के इतके झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जमिनीचे चार प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये ओलावा धरून ठेवणारी जमीन असते तेथे भात शेती होते. किनाऱ्यालगतच्या जमिनीजवळ सुपारी आणि नारळाच्या बागा असतात. डोंगर उताराच्या वरकस जमिनीत आंबा, काजू फळांसह नाचणी, वरीचे पीक घेतले जाते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.