Cotton MSP : कापसाची हमीभावाने खरेदी केली नाही तर होणार गुन्हा दाखल ?|संयुक्त किसान मोर्चा दिल्लीत धडकणार?

राज्यात कापसाला दर मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत. सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हमीभावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले आहेत.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

 पहिली बातमी कापसाच्या हमीभावाची

राज्यात कापसाला दर मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत. सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हमीभावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले आहेत. २०२३-२४ खरीप हंगामासाठी कापसाला ७ हजार २० रुपये हमीभाव सरकारनं जाहीर केलेला आहे. पण सध्या कापसाला या हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय. राज्यातील शेतकरी सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. यंदा कमी पाऊस आणि किड रोगांमुळे कापसाची उत्पादकता घटल्याचं शेतकरी सांगत आहेत.

दुसरी बातमी संयुक्त किसान मोर्च्याची

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दंड थोपटून केंद्र सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या किसान संयुक्त मोर्चानं पुन्हा एकदा दिल्लीला धडक देण्याचा निर्धार केलाय. १३ फेब्रुवारी रोजी हमीभावाच्या कायद्यासाठी 'दिल्ली चलो' मोर्चा पुकारण्यात आलाय. संयुक्त किसान मोर्च्याच्या जगजीत सिंग डल्लेवाल यांनी २०० हून अधिक शेतकरी संघटना या मोर्च्यात सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करताना हमीभावाचा कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आता कॉर्पोरेट क्षेत्राच्या दबावामुळे केंद्र सरकारने आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे मोर्चा पुकारण्यात आला आहे, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि अन्य राज्यातील शेतकरीही मोर्च्यात सहभागी होणार आहेत. हमीभाव कायदा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, शेतकरी आणि मजुरांसाठी पेन्शन, कर्जमाफी, लखीमपुर खिरीतील हिंसाचारातील पीडितांना न्याय या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं डल्लेवाल यांनी सांगितलं.     

Cotton Market
Cotton Farmer : एका व्यापाऱ्याने कसा लावला कापूस उत्पादकांना चुना?

तिसरी बातमी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची

आजपासून त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजाच्या पौषवारीला सुरुवात झाली. राज्यातील शेतकरी कष्टकरी मोठ्या प्रमाणात या वारीत सहभागी होत असतात. मंगळवारी एकादशी आणि संत निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळा होता. निवृत्तीनाथांच्या समाधीला ७२६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेत मोठ्या प्रमाणात राज्यातील विविध भागातून शेतकरी सहभागी झाले. राज्यावरील दुष्काळ मिटू देत असंही साकडं शेतकऱ्यांनी संत निवृत्तीनाथाला घातलं आहे. यावर्षी ५ लाख भाविक आणि ६०० दिंड्या दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे भक्तिरसात तल्लीन झालेली भाविकांची मांदियाळी त्र्यंबकेश्वरमध्ये जमली होती. 

चौथी बातमी उजनी धरणाची

उजनी धरणातील पाणीसाठी उणे ९ वर पोहचलाय. राज्यातील प्रमुख धरणांपैकी एक उजनी आहे. पण पाणीसाठी जानेवारी अखेरीस झपाट्याने कमी झालाय. त्यामुळं उजनी धरणावर पिण्याचं पाणी आणि शेती सिंचनासाठी अवलंबून असलेल्या गावांवरील दुष्काळाचं सावट गंभीर झालंय. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीला पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करतायत. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याला नकार दिला. अजित पवार म्हणाले, "पावसाळ्या अखेरी उजनीचा पाणीसाठी बऱ्यापैकी होता. पण त्याचं नियोजन केलं नाही. त्यात आता वरच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली जात असेल तर फारच झालं." असंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा उजनीचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com