Chhatrapati Sambhajinagar : ‘‘जवळपास २० वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करतो. दोन महिन्यांपासून त्यांच्यासाठी चारा विकतच सुरू आहे. यापुढे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच दुधाचे दर वाढले आहेत. जनावरे विकायला जावे तर घेण्यास कुणी नाही. त्यामुळे दरही २० ते ३० हजारांनी उतरलेत,’’ अशी भावना जालना जिल्ह्यातील (वरूडी, ता. बदनापूर) येथील परमेश्वर शिंदे यांनी व्यक्त केली.
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘खर्च वाढला अन् दूध दर घटले. त्यातही चारा, पाण्याने चिंता आणखी वाढविली. सरकारने छावणी नाही तर दावणीला तरी चाऱ्याची अन् पाण्याची सोय करावी.’’ प्रशासनाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ६९ लाख ८२ हजार २४ जनावरे आहेत. कमी अधिक प्रमाणात १०५ ते ३९५ दिवस चारा पुरणार असे दिसते. चारा जिल्हा बंदी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०५ दिवस तर लातूर जिल्ह्यात ३९५ दिवस पुरेल एवढा चारा आहे. एप्रिलनंतर चाराटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
जनावरांची आवक वाढली, दर उतरले
बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे नव्याने सुरू झालेल्या जनावरांच्या बाजारात जनावरांची आवक जवळपास २ ते ३ पटीने वाढली आहे. शिवाय दुभत्या जनावरांचे दर २० ते ३० हजाराने गत दोन, तीन आठवड्यांच्या तुलनेत उतरले आहेत.
चारा-पाण्याच्या प्रश्नामुळे जनावरे सांभाळण्याचे धाडस करण्यास कुणी धजावत नसल्याची स्थिती आहे. चारा दर वाढले आहेत. सुग्रासचे दर १४०० ते १९०० रुपये प्रति बॅग, तर पेंड १५५० ते २७०० रुपये प्रति गोणीपर्यंत आहेत. भागनिहाय कडबा पेंढी २००० ते ३००० रुपये प्रतिशेकडा तर मका मुरघास जागेवर २५०० ते २६०० रुपये आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.