
Tur ICRISAT Varity : हैदराबाद येथील इक्रिसॅट या संस्थेनं तुरीचं नवीन वाण विकसित केलं आहे. या वाणामध्ये उष्णतेला तोंड देण्याची क्षमता असून ४५ अंश सेल्सियसपर्यंतची तीव्र उष्णता हा तुरीचा वाण सहन करू शकतो, अशी माहिती इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक यांनी दिली आहे. तसेच नवीन जातीच्या मदतीने प्रति हेक्टर उत्पादन १.१ ते १.२ टनांवरून २ टनांपर्यंत वाढू शकते, असा दावा केला जात आहे.
इक्रिसॅटने नवीन तुरीच्या वाणाला नाव आयसीपीव्ही - २५४४४ असं दिलं आहे. कर्नाटक, ओडिशा आणि तेलंगणा राज्यात या वाणाच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कमी पाण्यात, कमी कालावधी उत्पादन देणाऱ्या तसेच उष्णतेमध्ये तग धरून राहण्याची क्षमता असलेल्या या वाणाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असंही शास्त्रज्ञाचं मत आहे.
या तुरीच्या वाणासाठी स्पीड ब्रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पारंपारिक पद्धतीने १५ वर्षांची प्रक्रिया या तंत्रज्ञानामुळे केवळ ५ वर्षांमुळे पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत वनस्पतींच्या वाढीचा कालावधी कमी करून अधिक संख्येनं पिढ्या कमी वेळात घेतल्या जातात, असंही शास्त्रज्ञानी सांगितलं आहे. तुरीच्या नव्या वाणामुळे उत्पादकता वाढेल आणि भारत तूर उत्पादनात आत्मनिर्भर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परंतु केंद्र सरकारच्या तूर आयातीच्या धोरणामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे तूर उत्पादकांना उत्पन्नाची हमी राहिली नाही, असं शेतकरी सांगतात.
कमी पाण्यावर तुरीचं वाण घेता येऊ शकतं, असं पाठक यांनी सांगितलं. ते म्हणाले “ही जात उन्हाळ्यात तूर उत्पादनाचे अडथळे दूर करते. पाण्याची गरज कमी आहे, उत्पादन कालावधी कमी आहे, आणि यंत्रस्नेही आहे. हे पिक सध्या भारतात तूर डाळीच्या टंचाई आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रभावी ठरू शकतं."
या वाण निर्मितीसाठी स्पीड ब्रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, असं इक्रीसॅटचे वरिष्ठ तूर पैदासकार डॉ. प्रकाश गंगाशेट्टी यांनी सांगितलं. ते म्हणाले, “स्पीड ब्रीडिंग ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असून, आमच्या शास्त्रज्ञांनी एक वर्षाच्या मेहनतीत हे तंत्र विकसित केलं. त्यामुळं ३-४ वर्षांत प्रगत जाती नोंदणीसाठी तयार होतात.”
या नव्या जातीच्या मदतीनं भारतातील सुमारे १.२ कोटी हेक्टर क्षेत्रावर जेथे खरीपात भात घेतला जातो. पण रब्बी हंगामात तापमान व पाण्याच्या कमतरतेमुळं पिकं घेतली जात नाहीत, त्या ठिकाणीही तुरीचं पीक घेतलं जाऊ शकतं, असं जाणकारांचं मत आहे. सध्या भारतात दरवर्षी ३.५ दशलक्ष टन तूर उत्पादन होतं. तर देशाची एकूण तुरीची गरज ५ दशलक्ष टन इतकी आहे. त्यामुळे दरवर्षी ८०० दशलक्ष डॉलर तूर आयातीसाठी खर्ची करावे लागतात. या नवीन वाणामुळे उत्पादकता वाढून आयातीवरील अवलंबित्व संपेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वैशिष्ट्ये काय?
- फुलोऱ्याच्या ४० दिवसांच्या कालावधीत उष्णतेत तग धरते.
- पाण्याची गरज खूपच कमी आहे.
- पिकाचा कालावधी ६-७ महिन्यांवरून केवळ ४ महिने आहे.
- सरसकट उंचीच्या झाडांमुळे मशिनद्वारे कापणी सुलभ होते.
- कर्नाटक, ओडिशा आणि तेलंगणा येथे यशस्वी चाचण्या झाल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.