Mother Name Implementation : परभणी जिल्ह्यातील वाडीदमई गावातील शांतामावशी आणि संपतकाका तरवटे ही काबाडकष्ट करणारी संसारी जोडी. शांतामावशीची अंगकाठी कामाने शब्दशः चिपाड झालेली आहे. दहा एकर शेतात मरमर करून दोन मुलींचे लग्न केले.
खस्ता खाऊन-खाऊन मुलगा पांडूला खूप शिकवले. पांडू आता नाशिकच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. मी पांडूला विचारले, ‘‘पांडू, डॉक्टर कसे होऊ वाटले?’’ पांडूचे उत्तर, ‘‘शिक्षणासाठी मी शहरात आलो.
शहरात येताना आईचे खडबडीत हात माझ्या चेहऱ्यावरून फिरायचे. बापाचे झिजणे आणि आईच्या त्या हातांनीच मला डॉक्टर होण्याचे बळ दिले.’’ पांडूचे हे उत्तर ऐकून मी सावध झालो. कष्ट करणारी आणि कष्टाची कदर करणारी अशी पिढी आजही खेड्यापाड्यात आहे. हे महाराष्ट्रातील प्रातिनिधिक उदाहरण दिलेले आहे.
इथे मला एक गोष्ट नमूद करायची आहे, की आपल्या महाराष्ट्रात आजही स्त्री आणि पुरुषांची संसारातील सगळ्याच गोष्टींची भागीदारी एकरूप होणारी आहे. संसारातून निर्माण झालेली पिढीसुद्धा आई-वडिलांची कृतज्ञता व्यक्त करून समृद्ध जीवनाची वाटचाल करत आहे. इथे मला एक लोकोक्ती आठवते, ‘माळी हाकितो मोट, माळीन धरी दारं, दोघाईच्या ईचारानं, मळा झाला हिरवागार.’ अर्थातच, दोघांच्या कर्माने आणि विचाराने संसार फुलला, असा याचा अर्थ आहे.
हे सर्व सांगण्याचे कारण असे आहे, की महाराष्ट्र राज्य सरकारच्या धोरणानुसार यापुढे सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी १ मे २०२४ पासून होत आहे.
जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, मालमत्तेचे उतारे, आधार कार्ड व पॅन कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, शैक्षणिक परीक्षा, महसूल, पगार पत्रक अशा विविध आठ कागदपत्रांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. प्रगत महाराष्ट्राच्या परिवर्तनाची नांदी या निमित्ताने देशभरात झाली आहे. याबद्दल महाराष्ट्र शासनाचे विशेष अभिनंदन! हा शासन निर्णय १ मे २०२४ नंतर जन्म झालेल्या मुलांनाच लागू होणार आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे एक शेतकरी आणि त्याची अर्धांगिनी हे दोघेही मिळून रसरशीत जीवन शेतीत काम करूनही संतुलित, शांत आणि समजपूर्वक जगत आहेत. इथे स्त्री आणि पुरुष असा कुठलाही तुलनेचा विषय नाही. दोघांनीही सहविचाराने आणि सहअनुभवाने कुटुंबाचा सांभाळ करून आयुष्य स्ट्रॉंग करावे, यासाठी मी हे लिहीत आहे.
निसर्गतः महिलांचा स्वभाव शांत आणि संयमी असतो. एकदम उतावीळपणाने पुरुषासारखे कुठल्याही गोष्टीवर रिअॅक्ट व्हायचे नाही. बरेच दिवस अनुभव आणि आकलन करून; योग्य वाटले तरच कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद द्यायचा; अन्यथा स्वतःचा विचार-सामाजिक दबाव-कुटुंबावरील परिणाम-आयुष्यात होणारे बदल यासारख्या अनेक गोष्टींचा विचार करून सक्षम निर्णय महिला घेतात आणि तो विषय पूर्णत्वाला नेतात.
स्त्रियांचा नैसर्गिकपणा, सौंदर्याचा अहंभाव, इतरांना समजून घेण्याचा कमी-अधिकपणा, संकुचित वृत्ती, संवादाचा अभाव, देवभोळेपणाचा अतिरेकीपणा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आस्वादक वृत्ती असतानाही कमालीची सोशिकता असल्यामुळे स्त्रिया मानसिकदृष्ट्या दबावात राहत असतील. पण मुद्द्याची गोष्ट अशी आहे,
की पती-पत्नीचे अकाली निधन, घटस्फोट, विरह, शारीरिक दुर्बलता, विचित्र मानसिकता, अनैसर्गिक आवड आणि गरजा अशा अनेक कारणांमुळे पती-पत्नीच्या दर्जात मिठाचा खडा पडतो. व्यसनाधीनता हेही महत्त्वाचे कारण आहे, पती-पत्नीच्या अंतर्गत संसारात. मद्यपी सारंगला स्वीकारून सरस्वतीने दोन लेकरांना शिकवण्याचा धडाका सुरू केला.
त्या वाचन आणि लेखन करून स्वतःला बळकट करत आहेत. मी सरस्वती यांना विचारले, ‘‘काय सांगाल वर्तमान संसाराबद्दल?’’ त्या म्हणाल्या, ‘‘अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार, माझ्या जिवाचा मंतर, त्याच्यावरती मदार’’, असे थोर कवयित्री बहिणाबाई चौधरींनी लिहून ठेवलेले आहे. मी याच विचाराने जीवन जगत आहे.’’ त्यांच्या या धाडसाचे आपण माणूस म्हणून जाणून घेणे महत्त्वाचे नाही का? त्यामुळे स्त्रियांच्या अडीअडचणींचे समग्र आकलन झाल्याशिवाय पुरुषांनी किंवा समाजाने भाष्य करणे बरोबर नाही.
पूर्वीपासून स्त्रीनेच अन्नावर उत्तम संस्कार करून अन्न चवदार केलेले आहे. पुरुषांचे शक्तिमान शरीर पोसण्यासाठी कष्ट उचललेले आहेत. संसाराची गोड-तिखट-कडू-खारट चव स्त्रियांना अनुभवाची आहे. त्यामुळे स्त्रिया अधिक सजग असतात. स्त्रियांच्या आयुष्यात संसाराची गोडच चव पुरुषांनी द्यायला पाहिजे.
पण अचानक अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा भांडणे झाल्यानंतर, जीवनातून पतीची साथ सुटल्यानंतर तिची अवस्था विमनस्क होते. स्वतः अरण्यरुदन करून ती स्वतःवर आवर घालते. आता काळानुरूप बदल होऊन तिच्याही बाबतीत पुरुषांसारखाच समसमान विचार होऊन पुनर्विवाह होत आहेत, समजून घेणारे मित्र लाभत आहेत.
स्त्रियांनी आनुवंशिकता, हार्मोन्स, व्यक्तिमत्त्व आणि तणाव हे घटक योग्यरीत्या ओळखणे मानसिक आरोग्यावर-विकरांवर प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. यामुळेच महिलांनी आपल्यातील स्वघटक जाणून घेणे केव्हाही चांगले. स्त्रियांची ऊर्जा सकारात्मक गोष्टींसाठी उपयोगाला येते आणि अनेक चांगल्या गोष्टी घडवून कुटुंबाला, समाजाला आणि पर्यायाने देशाला आकार आणि आधार प्राप्त होत असतो.
चांगल्या गोष्टींचा सुगावा स्त्रियांना अगोदरच लागलेला असतो. वाईट गोष्टींचा पायंडा त्या पडू देत नाहीत, म्हणजेच आयुष्याचा गंध त्या सतर्कपणे जपत असतात. चटके सोसून जीवनाचा गंध कितीतरी बायांनी आयुष्यामध्ये निर्माण केलेला आहे. त्यांचा सन्मान विशेषतः पुरुषांनी करायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्यावर फुले उधळण्याची गरज नाही.
दुसऱ्यांची मनं राखण्यासाठी महिला सकारात्मक आणि कामाचे बोलतात, हेही खरे आहे. दुसरी गोष्ट, पुरुष रागाने गरम होऊन बोलू लागले, की महिला ऐकून घेतात. परत त्या सांगतात, ‘‘भरतार तापला, काय करील तापून, त्याच्या मर्जीसाठी, हळू बोलावं आपून’’, हे महिलांचे सांगणे सयुक्तिक आहे! ते जपले पाहिजे.
कदाचित काही विचार करणारी पुरुषमंडळी त्यामुळे घरात महिलांचे ऐकून घेत असावेत, म्हणून आता संवादाची आणि श्रवणाची उत्तम साथसंगत होत आहे. या लेखनावरून आपल्याला बरेच काही कळून आलेले आहे. दिवसभरात त्या त्या वेळेला पुरुषांनी महिलांचे मन जाणून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्याकरिता आपल्या घराला जपण्याची काळजी घ्यावी. महिला आतून-काळजातून फुलून येतात, नातेसंबंधाचा बहर कायम राहतो. आई आणि आईच्या नावाच्या सन्मानाला जगात तोड नाही.
(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.