
Washim News : जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः रिसोड व मंगरुळपीर तालुक्यांत मंगळवार (ता. २२ ) व बुधवारी (ता. २३ ) झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे १५ हजार ५९ हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या नैसर्गिक आपत्तीत एकूण १३ हजार १८८ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पीकपाहणी अहवालानुसार सोयाबीन, तूर, कपाशी या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रिसोड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तब्बल ११ हजार ८३८ शेतकऱ्यांचे अंदाजे १३ हजार २६९ हेक्टर क्षेत्रावर पीक नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.
या भागात सोयाबीन, तूर या पिकासह काही ठिकाणी मका व इतर पिकेही पाण्याखाली गेल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. मंगरुळपीर तालुक्याचीही गंभीर स्थिती आहे. या तालुक्यातील १३५० शेतकऱ्यांचे १७९० हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीच्या तडाख्याने बाधित झाले आहे. येथे सोयाबीन, कपाशीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जमीन खरडून गेली
या दोन तालुक्यांतील अनेक भागांत नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे ३१ गावांत शेतीखालची जमीन खरडून जाण्याचे भीषण चित्र दिसून आले. रिसोड तालुक्यातील ८ गावांत ८१२ हेक्टर जमीन, मंगरुळपीर तालुक्यातील ८ गावांत ३३० हेक्टर जमीन अशी एकूण ११४२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. ही जमीन आता लागवडीसाठी योग्य राहिलेली नाही.
या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. स्थानिक तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यानंतर हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मदतीसाठी पाठविण्यात येणार आहे. अंतिम अहवालात नुकसानीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.