
Pune News : राज्यात मॉन्सूनोत्तर वादळी पाऊस आणि गारपिटीने रविवारपासून (ता. २६) तडाखा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, मंगळवारी (ता. २७) विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने राज्यातील हजारो हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून, शेतकरी धास्तावला आहे. मंगळवारी दुपारनंतर मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली होती.
अकोला जिल्ह्यात सोमवारी (ता.२७) रात्री बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी (ता.२८) पहाटेसुद्धा जोरदार पाऊस झाला. अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत बहुतांश मंडलांमध्ये पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वाशीम जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्याच्या मृत्यू झाला आहे. तर शंभरहून अधिक मेंढ्या दगावल्या आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेडनेटसह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २८) कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम होती. कळंब व धाराशिव तालुक्यांतील काही मंडलांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसासह तूर, मका आदी रब्बी तसेच केळी, मोसंबी आदी फळपिकांचे नुकसान झाले.
नांदेड जिल्ह्यात मंगळवारी (ता. २८) सलग दुसऱ्या दिवशी माहूरसह इतर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेत गारवा जाणवत आहे. या पावसामुळे रब्बीला फायदा झाला असला तरी कपाशी, केळी, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतही सलग दुसऱ्या दिवशीही हलका ते मध्यम पाऊस झाला.
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी (ता. २८) दुपारनंतर अनेक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. सकाळपासून जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान होते. जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्याने नुकत्याच सुरू झालेल्या ऊस तोडणीला याचा अडथळा येण्याची, तसेच गुऱ्हाळ घरांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सांगली जिल्ह्यात मंगळवारी पहाटे मिरज तालुक्यातील काही भागात तर दुपारी मणेराजुरी, खंडेराजुरी, मल्लेवाडी कुमठे बेळंकी सावर्डे, नागठाणे नरवाड, कवलापूर, येळावी, सावळज, तासगाव या भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. पावसामुळे तयार झालेले मण्यांना तडे जाण्याची, द्राक्ष पिकावर डाऊनी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.
सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी (ता. २८) सकाळी सातच्या सुमारास मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी आणि अन्य काही भागात पावसाने हलकी हजेरी लावली. उत्तर सोलापुरातील पडसाळी, रानमसले, कारंबा, नान्नज, मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, लांबोटी, शिरापूर, बार्शी भागातील वैराग, शेळगाव परिसरात पावसाने हलकी हजेरी लावली. सध्या काही भागात रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. कांद्याची काढणी सुरू आहे. त्यामध्ये अडथळे येणार आहेत. त्याशिवाय डाळिंब, द्राक्ष बागांनाही त्याचा फटका बसणार आहे.
पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवारी (ता. २६) आणि सोमवारी (ता. २७) या सलग दोन दिवसांत झालेल्या पाऊस आणि गारपिटीने शेतीसह, पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, भात आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) रात्रीही अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे.
मंगळवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :
मध्य महाराष्ट्र :
जामनेर ७०, पाथर्डी ५०, बोधवड, रावेर प्रत्येकी ४०, मक्ताईनगर २०.
मराठवाडा :
कळबं ४०, परतूर, धाराशीव प्रत्येकी ३०, सोयगाव, आंबड, सोनपेठ, पैठण प्रत्येकी २०.
विदर्भ :
पुसद ६०, खामगाव, मंगरूळपीर प्रत्येकी ५०, करंजालाड, मालेगाव, चांदूर बाजार, नेर प्रत्येकी ४०, जळगाव जामोद, दर्यापूर, नागपूर, अंजनगाव, संग्रामपूर, मोर्शी, परतवाडा, आष्टी, महागाव, चिखलदरा, शेगाव, नांदगाव काझी, रिसोड, मानोरा, बटकुली, चांदूर रेल्वे, तेल्हारा, अमरावती, मेहकर, अकोट प्रत्येकी ३०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.