Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Marathwada Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील स्थिती, १ व्यक्तीचा मृत्यू, ५३६ जनावरे दगावली
Marathwada Heavy Rain
Marathwada Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Crop Damage : परभणी ः परभणी व हिंगोली जिल्ह्यात रविवारी (ता. १) ते सोमवारपर्यंत (ता. २) झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या, पिकात पाणी साचल्याने प्राथमिक अंदाजानुसार ५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात पुरात वाहून गेलेल्या १ व्यक्तीचा मृत्यू झाला. या दोन जिल्ह्यांतील लहान मोठी मिळून एकूण ५३६ जनावरे दगावली आहेत. पुरामुळे विहिरींमध्ये गाळ जमा झाला आहे. तुषार, ठिबक संच, पीव्हीसी पाइप वाहून गेले. रेशीम कीटकसंगोपनगृहा, सौरपंप, शेती अवजारे पुरामध्ये वाहून गेली. आखाड्यावरील निवारे, गोठ्यांचे देखील मोठे नुकसान झाले.

परभणी जिल्ह्यात यंदा ५ लाख २७ हजार ९१० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असून अतिवृ्ष्टीमुळे सुमारे २ लाख ५० हजार हेक्टरवरील खरीप, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे पू्र्ण झाल्यानंतर अंतिम बाधित क्षेत्र निश्चित होईल. लहान दुधाळ, मोठी, दुधाळ, ओढ काम करणारी मिळून एकूण ४५३ जनावरे दगावली. भारतीय सेना दलाच्या पथकाने पुरामध्ये अडकलेल्या वाई बोथ (ता. सेलू) येथील शेतातील ६ व्यक्ती तसेच शेळगाव (ता. सोनपेठ) येथील ६ व्यक्तींची सुटका केली. करपरा नदीच्या पुरात अडकलेल्या बोर्डी (ता. जिंतूर) येथील १ व्यक्तीच्या सुटका केली.

Marathwada Heavy Rain
Heavy Rain : आठ हजार हेक्टरवरील पिकांचे पूर, अतिवृष्टीने नुकसान

रस्ते वाहून गेल्यामुळे तसेच पुल पाण्याखाली गेल्यामुळे जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, पालम ५ तालुक्यांतील २३ गावांचा रस्ते मार्गे संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील १५२ घरांची पडझड झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा ३ लाख ४९ हजार ८५९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असून अतिवृष्टीमुळे सुमारे २ लाख ४९ हजार ८३९ हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत सर्व तहसीलदार यांना आदेशीत करण्यात आलेले आहे. टेंभूर्णी (ता. वसमत) येथील सुभाष सवंडकर (वय ३८) हे नाल्याच्या पुरात वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

सारगवाडी (ता. औंढा नागनाथ) येथील संजय ठोंबरे (वय ३३), चैतन्या ठोंबरे (वय १०) हे नाल्याच्या पाण्यात वाहून गेले. जिल्ह्यातील लहान दुधाळ जनावरे (शेळी- मेंढ्या) १९, मोठी दुधाळ जनावरे (गाय, म्हैस) ३८, ओढकाम करणारी लहान जनावरे (वासरू-शिंगरू) १९ तसेच मोठी जनावरे (बैल-घोडा) ७ मिळून एकूण ८३ जनावरे अतिवृष्टीमुळे दगावली. ७७ गोठ्यांचे नुकसान झाले. नदीच्या पुरामुळे अडकून पडलेल्या ८७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे बाधित कुटुंबांतील २१८ नागरिकांना स्थलांतरित करून त्यांच्या निवास आणि भोजनव्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. टाकळगव्हाण व कोंढूर या २ गावांचा संपर्क तुटला होता. राज्य, प्रमुख जिल्हा मार्ग प्रत्येकी ९ असे एकूण १८ मार्ग तर जिल्हा परिषदेचा १ रस्ता बंद पडला होता.

अतिवृष्टीमुळे शेताजवळच्या ओढ्याला मोठा पूर आला. शेतातील रेशीम कीटक संगोनपनगृहामध्ये चार फूट पाणी शिरले. त्यात चंद्रिका वाहून गेल्या. तुती छाटणीसाठीचे स्वयंचलित कटिंग यंत्र, ग्राइंडर यंत्र गाळात बुडाल्याने काही यंत्र वाहून गेले. विहिरीमध्ये मोठ्या प्रमााणावर गाळ जमा झाला आहे. कृषिपंपांचे स्टार्टर वाहून गेले. संपूर्ण एकरभर तुती पाण्यात बुडाली होती. तुती बागेतील पीव्हीसी पाइप, ठिबकच्या नळ्या वाहून गेल्या. उद्या-परवा अंडीपुंज येणार होते. नवीन बॅच सुरू करणार होतो. परंतु आता तुतीच्या पानावर गाळ जमा झाल्याने महिना दोन महिने नवीन बॅच सुरू करणे शक्य नाही. - राधेश्याम खुडे, रेशीम उत्पादक, बोरगव्हाण, ता. पाथरी, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com