
Pune News : चालू वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत दमदार झालेल्या पावसामुळे भूजल पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. राज्यातील अवघ्या चार तालुक्यांत भूजल पातळीत किंचित घट झाल्याचे आढळून आले आहे. येत्या काळात या तालुक्यांत सामान्य पाणी टंचाईचे संकेत देण्यात आले असल्याचे भूजल विभागाने जाहीर केलेल्या भूजल पातळीच्या अहवालातून दिसून आले आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात दमदार पाऊस न झाल्याने त्याचे परिणाम चालू वर्षी जानेवारी महिन्यापासून जाणवू लागले होते. त्यातच भूजल पातळी चांगलीच खोल जाऊ लागली होती. त्यामुळे राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी ३१ तालुक्यांत पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले होते. त्यातून टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. तर ३२२ तालुक्यांत पाणीपातळी सरासरी होती. तरीसुद्धा या तालुक्यांना पाणीटंचाईची झळ बसली होती.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरवर्षी ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यांत पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या विहिरीमधील भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. त्याकरिता राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय ३ हजार ९२० निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत.
भूजलाची उपलब्धता मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या नैॡत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे सप्टेंबरअखेर राज्यात पर्जन्यमान व ऑक्टोबरमधील भूजल पातळी यांच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचा सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान व भूजल पातळीत झालेली वाढ अथवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत भूजल पातळी निर्देशांक काढले जातात.
ऑक्टोबर २०२४ मधील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास मागील दहा वर्षांच्या सरासरी भूजल पातळीशी करण्यात आला. यात जलधरातून विविध कामांसाठी मुख्यत्वे सिंचनाकरिता तसेच पिण्याच्या पाण्यासाठी झालेला भूजल उपसा व त्यामुळे भूजल पातळीत झालेला बदल या बाबतची माहिती ऑक्टोबर २०२४ मध्ये निरीक्षण विहिरींमधील घेतलेल्या स्थिर भूजल पातळीच्या अभ्यासावरून दिसून येते.
ऑक्टोबर अखेरमधील निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीचा मागील दहा वर्षांतील जानेवारी महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक करण्यात आला. यात राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी ३४९ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असून, अवघ्या ४ तालुक्यांत भूजल पातळीमध्ये किंचित घट आढळून आली आहे. राज्यात दुष्काळ ओळखण्यासाठी सामान्य दुष्काळ, सौम्य दुष्काळ, तीव्र दुष्काळ तर अतितीव्र दुष्काळ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार या चार तालुक्यांत सामान्य दुष्काळ जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सप्टेंबरअखेर पर्जन्यमान आणि निरीक्षण
विहिरीतील स्थिर भूजल पातळीचा तुलनात्मक व अभ्यासाआधारे संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची संख्या अनुमानित केली जाते. ऑक्टोबरअखेर जिल्हा स्तरावर तयार झालेल्या टंचाई आराखड्यानुसारच जिल्हास्तरावर टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या अंमलबजावणीची कामे केली जातात. जानेवारी, मार्च आणि मे अखेरीस भूजल पातळीच्या तुलनात्मक अभ्यासाधारे टंचाई परिस्थितीचा केवळ अंदाज घेतला जातो. मात्र या आधारे नव्याने संभाव्य पाणीटंचाई भासणारी गावे ही घोषित केली जात नाहीत.
भूजल पातळी खोल जाण्याची कारणे
- पावसाचे स्थळ, वेळ आणि दोन पावसातील खंड.
- भूजलाचा सिंचनाकरिता होणारा अति उपसा.
- भूजलाचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव.
- कमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण.
- पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी.
या चार तालुक्यांत आहेत सामान्य पाणीटंचाईचे संकेत :
जिल्हे --- तालुके
चंद्रपूर -- बल्लारपूर
सातारा -- खटाव
ठाणे -- डहाणू, जव्हार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.