Kolhapur News : गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी प्रति टन शंभर रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते. अखेर यावर बैठकीत तोडगा निघाल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी करताच फटाक्यांची आतषबाजी करून आंदोलन स्थगित करण्यात आले.
ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना गेल्या वर्षी उसाचा दर प्रति टन ३००० रुपयांपेक्षा कमी दिलेला आहे त्यांनी मागील हंगामाचे १०० रुपये अतिरिक्त प्रतिटन द्यावेत व ज्यांनी ३००० रुपयांपेक्षा जास्त दर दिलेला आहे, त्या साखर कारखान्यांनी ५० रुपये प्रतिटन अतिरिक्त शेतकऱ्यांना द्यावेत. असा तोडगा सायंकाळी सात वाजता झालेल्या बैठकीत काढण्यात आला.
यंदाची एफआरपी किमान ३१०० रुपये प्रतीटन प्रमाणे सर्व कारखान्यांनी द्यावी, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करावा. कारखान्यांनी ही रक्कम दोन महिन्यांच्या आत द्यावी त्याबाबतचे संमती पत्र तातडीने द्यावे, असेही या बैठकीत ठरले.
संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासहित हजारो ऊस उत्पादकांनी महामार्गावरील शिरोली पुलावर सकाळी अकरा वाजता ठिया मारला. सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने महामार्गावर शेतकरी बसून होते. जसा वेळ जाईल तशा संतापाच्या भावना व्यक्त होत होत्या. तोडगा निघत नसल्याने उत्पादक आक्रमक झाले होते.
सकाळी अकरा वाजल्यापासून दिवसभर उन्हामध्ये ऊस उत्पादक शेतकरी बसून होते. कुठून तरी तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. पण दिवसभर कारखाना पातळीवरून किंवा शासन पातळीवरूनही श्री. शेट्टी यांच्याशी संपर्क झाला नाही, यामुळे तोडगा निघू शकला नाही. काही कारखानदार गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसास शंभर रुपये प्रति टन देण्यास तयार असल्याच्या चर्चा आंदोलनस्थळी होत्या.
मात्र याला कोणत्याही कारखानदाराने दुजोरा दिला नाही. काही कारखानदारांशी संपर्क साधला असता अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कारखानदारांनी सांगितले. अखेर सायंकाळी चार वाजता शाहू छत्रपती महाराज यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
याचवेळी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत कारखानदारांची बैठक घेण्यास अनुकूलता दाखवली. यानंतर सर्व जण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक आदी संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
पाच हजार ऊस उत्पादकांनी केले महामार्गावर जेवण दरम्यान, आंदोलन लांबणार असल्याचे लक्षात येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिया मांडून असलेल्या ऊस उत्पादकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यास प्रारंभ केला. सायंकाळी पाचच्या सुमारास महामार्गावरच एकाच वेळी चार ते पाच हजार ऊस उत्पादकांनी रस्त्यावर जेवण केले.
वाहतुकीचे नियोजन कोलमडले ‘स्वाभिमानी’च्या या आंदोलनामुळे कराड ते कोल्हापूरपर्यंतची सर्व वाहतूक ठप्प झाली. लहान गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या असल्या, तरी मालवाहू गाड्या मात्र ठप्प झाल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.