.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Jalgaon News : खानदेशात मागील ३० ते ३२ दिवसांपासून जळगाव, धुळे व नंदुरबारमधील अनेक मंडले, गावांत रोज पाऊस येत आहे. शेतात वाफसा नाही. काळ्या कसदार जमिनीत पिकांत पाणीच पाणी साचले आहे. यामुळे आता ओल्या दुष्काळाची भीती आहे. जिल्ह्यात शनिवारी (ता. ३) व रविवारी (ता. ४) अनेक भागांत मध्यम ते हलका पाऊस झाला. शनिवारी मध्यरात्रीनंतर अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. सततच्या पावसाने खानदेशात शेतीची कामे ठप्प असून, घरे-गोठ्यांची हानी होत आहे.
मागील हंगामात जून व ऑगस्टमध्ये पावसाचा खंड होता. पाऊसमान जेमतेम राहिले. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांची पेरणी अनेक जण पावसाअभावी वेळेत करू शकले नाहीत. उत्पादनासही फटका बसला होता. यंदा पाऊस जून व जुलैत चांगला राहिला. परंतु जुलैत सतत पाऊस येत आहे. एकही दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशित जुलैत राहिला नाही.
जळगावातील जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागांत मागील ३० ते ३२ दिवसांपासून रोज पाऊस येत आहे. अन्य भागांतही पाऊस आहे. परंतु उघडीप नसल्याने पिकांत आंतरमशागत, तणनियंत्रणासाठी वाफसा स्थिती नाही. तणनाशकांचा अधिकचा वापर करावा लागत आहे.
काही भागात रोज पाऊस असल्याने तणनाशकांची फवारणीदेखील करता आलेली नाही. यामुळे ही फवारणी रखडली असून, काळ्या कसदार जमिनीत सखल भागात पाणीच पाणी आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचत आहे. त्यावर पाऊस पुन्हा पुन्हा येत आहे. यामुळे जळगाव, शिरपूर, शहादा, तळोदा व अन्य भागांतील काळ्या कसदार जमिनीतील पिके अतिपावसाने हातची जातील की काय, अशी स्थिती आहे.
ओल्या दुष्काळाची स्थिती
खानदेशात आता ओल्या दुष्काळाची भीती आहे. कारण कापसासह ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांची हानी होऊ लागली आहे. भाजीपाला पिकांतही नुकसान होत आहे. फूल-पाते गळीची समस्या कापूस पिकात दिसत आहे. पपई पिकाचीदेखील पावसाने अनेक भागात हानी झाली आहे. पिकांची वाढ खुंटली असून, सखल भागांत पाणी साचल्याने कापूस पीक पिवळे-लाल पडून खराब झाले आहे. मोठी हानी होत असून, पावसाने खराब झालेल्या पिकांत खते, फवारणीचाही उपयोग नसल्याची स्थिती आहे.
पावसाची टक्केवारी मोठी
जळगाव जिल्ह्यात एकूण ६३२ मिलिमीटर पाऊस पडतो. यातील ४२१ मिलिमीटर पाऊस आतापर्यंत झाला असून, एकूण सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी जून व ऑगस्टमध्ये पावसाचा खंड होता. यंदा सर्वच तालुक्यांत जून व जुलैमधील पावसाच्या सरासरीच्या तुलनेत १०० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबारमध्येही आतापर्यंत एकूण सरासरीच्या तुलनेत ६५ टक्क्यांवर पाऊस झाला आहे. नंदुरबारचे एकूण पाऊसमान ८५२ मिलिमीटर आहे. तर धुळ्यातही एकूण सरासरीच्या तुलनेत ६० टक्क्यांवर पाऊस झाला असून, जिल्ह्याचे एकूण पाऊसमान ५६५ मिलिमीटर आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.