
Akola News : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांनी सुरुवातीला नोंदणी केली होती. मात्र, तांत्रिक अडचणी व माहितीतील विसंगतीमुळे काही शेतकऱ्यांची नावनोंदणी दोनवेळा झाली.
सुरुवातीला अशा शेतकऱ्यांना तीन ते चार टप्प्यांत निधी मिळालाही, पण त्यानंतर सन्मान निधी थांबवण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून हे शेतकरी निधीसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत असून, अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात अशा २५ शेतकऱ्यांची यादी समोर आली आहे. यातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षांत या निधी योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही. यातील अनेक शेतकऱ्यांनी सातत्याने तहसील कार्यालय, कृषी विभाग व महा-ई-सेवा केंद्रांना भेटी दिल्या.
मात्र, कधी आधार कार्ड अपडेट करण्यास सांगण्यात आले, तर कधी खात्याची पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, शेतजमिनीचे ७/१२ उतारे घेऊन येण्याचे आदेश मिळाले. हे सर्व देऊनही अद्याप ‘दुहेरी नोंदणी’चा मुद्दा मिटवण्यात आला नाही.
या बाबत एक शेतकरी म्हणाले, की मी २०१९ मध्ये योजनेत नोंदणी केली. पहिल्या वर्षी नियमितपणे निधी मिळाला. मात्र, चौथ्या हप्त्यानंतर निधी थांबला. सतत तहसील व कृषी कार्यालयात चौकशी केली. शेवटी कळाले की माझे नाव दोनवेळा नोंदवल्या गेले. पण दोन्ही नावांची बँक खाती, आधार क्रमांक एकच आहे.
तरीही त्रुटी दाखवून अपात्र ठरवले जात आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. ही स्थिती फक्त बाळापूरच नव्हे, तर सर्वत्र आहे. अनेक तालुक्यांमध्ये असे शेतकरी आहेत. पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेत अचूक माहिती अपलोड न झाल्यामुळे काही शेतकऱ्यांची नावे दोनवेळा नोंद झाल्याने यंत्रणेने अशा लाभार्थ्यांना ‘ड्युप्लिकेट’ ठरवत निधी रोखला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.