
Punjab News: पंजाब आणि हरियाना सीमेवरील शंभु, अंबाला आणि कनौरी बॉर्डरवरील गेल्या वर्षांपासून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे मोर्चे पंजाब पोलिसांनी बळाने हटविले आहे. ठिकठिकाणांहून बुधवारी (ता.१९) शेतकरी नेत्यांची धरपकड केल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांना तेथून हलविले. याठिकाणी उभारण्यात आलेले तात्पुरते ठिय्ये बुलडोझर लावून मोडण्यात आले. या कारवाईने देशभरांत शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून विरोधी पक्षांनीही केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
पंजाब, राजस्थान आणि हरियाना येथील शेतकरी संयुक्त शेतकरी मोर्चा (अराजकीय) व किसान मजदूर मोर्चा (केएमएम)च्या नेतृत्वाखाली १३ फेब्रुवारी २०२४ पासून शंभु आणि कनौरी बॉर्डर येथे धरणे आंदोलन करत होते. ‘किमान आधारभूत मुल्यास कायदेशीर मान्यते’सह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीकडे कूच करताना शेतकऱ्यांना अडविण्यात आल्यानंतर त्यांचे येथे र्मोचे लागले होते.
प्रारंभी या आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या हस्तक्षेपानंतर सरकार चर्चेस तयार झाले. यापूर्वी केंद्र सरकारबरोबर चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या होत्या. एकदिवस आधीच बुधवारी शेतकरी आणि केंद्र सरकारबरोबर चर्चेची सकारात्मक सातवी फेरी झाली, त्यानंतर लगेचच पंजाब सरकार हरकती आले. आधी शेतकरी नेत्यांची धरपकड आणि नंतर शंभु आणि कनौरी येथील आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड करण्यात आली.
या कारवाईवर पंजाब, हरियाना, राजस्थान, झारखंडसह देशभरात जोरदार हल्लाबोल करण्यात आला. पंजाब आणि राजस्थानात निषेध आंदोलने करण्यात आली. माजी शिरोमणी अकाली दल नेते सुखबिर सिंग बादल यांनीही पंजाब सरकारला शेतकरी आंदोलकप्रश्नी धारेवर धरले. किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते सतनाम सिंग पन्नू यांनी केंद्र आणि पंजाब सरकारच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच याविरोधात हरियाना आणि पंजाब राज्यातील उपायुक्त कार्यालयासमोर समितीने निदर्शने केले. ते म्हणाले,‘‘भागवत मान सरकार आणि मोदी सरकार यांना या शेतकरी विरोधी कृत्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागेल.’’
भारतीय किसान युनियन (बीकेयु)चे नेते राकेश टिकैत यांनी कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. ‘एका बाजूला शेतकरी संघटनांबरोबर सरकार चर्चा करते, दुसऱ्या बाजूला त्यांना अटक करते, हे निषेधार्ह आहे,’ असे श्री. टिकैत म्हणाले.
ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू आणि किसान कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बजरंग पुनिया म्हणाले, ‘‘केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर चर्चेचे केवळ नाटक करत आहे. चर्चेनंतर शेतकऱ्यांना अटक करणे म्हणजे, त्यांच्या प्रश्न सोडविण्यासंदर्भात सरकार गंभीर नाही, हेच सिद्ध होते. सरकारने शेतकऱ्यांना धोका दिला आहे.’’
कॉंग्रेसकडून जोरदार टीका
नवी दिल्ली : शंभु आणि कनौरी सीमेवरून शेतकऱ्यांची उचलबांगडी केल्यानंतर कॉंग्रेसच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले. या आंदोलकांची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही भेट घेतली. पंजाबचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना याबाबत जबाबदार धरत, शेतकऱ्यांप्रती असलेल्या त्यांच्या भूमिकांवर पंजाबचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अमरिंदर सिंग राजा यांनी जोरदार टीका केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.