Cotton Seed : अकोल्यात कपाशीच्या बियाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

Seed Shortage : कपाशीच्या एका वाणाची मागणी दररोज गंभीर वळण घेत आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे सर्व यंत्रणा हतबल झाली आहे.
Seed Shortage
Seed Shortage Agrowon

Akola News : कपाशीच्या एका वाणाची मागणी दररोज गंभीर वळण घेत आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे सर्व यंत्रणा हतबल झाली आहे. मंगळवारी (ता. २८) शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून विक्रेत्यांनी दुकाने बंद करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आपली बाजू मांडली.

सध्या अकोल्यात कपाशीचे बियाणे विक्री प्रकरण तापले आहे. दरम्यान या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उडी घेत ‘सरकार-प्रशासन ‘एसी’ मध्ये कूल- बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल’ असे ट्विट करीत शासनावर टीकेची झोड उठवली.

यंदाच्या हंगामासाठी शासनाने १६ मे पासून बियाणे विक्रीला परवानगी दिल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच अकोल्यात कपाशीच्या एका वाणाचे बियाणे मिळवण्यासाठी शेतकरी रांगा लावत आहेत. कंपनीने बियाण्याचा कमी पुरवठा केल्याने दिवसेंदिवस स्थिती गंभीर वळण घेत आहे. दररोज महिला, पुरुष शेतकरी दिवसभर रांगेत उभे राहत आहेत. दुसरीकडे अकोला जिल्ह्यात उष्णतामान कमालीचे वाढलेले आहे.

Seed Shortage
Cotton Seeds : अकोल्यात बियांणावरून शेतकरी संतप्त; थेट रस्त्यावर उतरून केलं आंदोलन

अशा स्थितीत बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा बांध फुटला. मंगळवारी (ता.२८) अकोल्यातील टिळक मार्गावर शेतकरी रस्त्यावर आले. हजारो शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची समजूत काढायला आलेल्या अधिकाऱ्यांनाही प्रश्‍नांची सरबत्ती केली. जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार सुरू असून आम्हाला कपाशीचे बियाणे उपलब्ध करून द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.

विक्रेत्यांचा बंद

शेतकरी आक्रमक झाल्याने विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिस बंदोबस्त असूनही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे विक्रेत्यांनी तातडीने बंद करून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. कृषी विक्रेत्यांना होत असलेला जाचक त्रास थांबवावा. शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला असल्याने जोपर्यंत कायदा व सुव्यवस्था सुरळीत होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालक आपली कृषी केंद्रे उघडण्यास असमर्थ आहेत, असे विक्रेत्यांनी निवेदन दिले.

Seed Shortage
Cotton Seed Sale : कापूस बियाण्याबाबत कृषी विभागाचे ढिसाळ नियोजन

सरकार-प्रशासन ‘एसी’ मध्ये कूल ः वडेट्टीवार

अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. असे असतानाही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्‌तास रांगेत ताटकळत ठेवले जात आहे. शेतकरी कपाशीच्या बियाण्यांसाठी धडपड करीत आहे. रांगेत लागून बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे. बाजारात शेतकऱ्यांना हव्या असलेल्या नेमक्या बियाण्यांचा तुटवडा आहे.

तुटवड्याचे कारण पुढे करीत प्रत्येक शेतकऱ्याला केवळ दोन पाकिटे दिली जात आहेत. सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेही काढले. तक्रारी करण्यात आल्या. परंतु संवेदनशीलता हरविलेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही.

आम्ही दोन-दोन पक्ष कसे फोडले, गळ्याचा पट्टा कसा काढला, दादा-भाई वर अन्याय कसा झाला यासारख्या विषयांवर दिवसभर प्रतिक्रिया देत सुटणारे महायुतीतील नेते या शेतकऱ्यांच्या ह्या अवस्थेवर अजूनही गप्प आहेत. सत्तेचे गुऱ्हाळ चालविण्यात व्यस्त आहेत, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com