
ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik News : येवला, जि. नाशिक : जिल्हा बँकेचे सुमारे ५६ हजार थकीत कर्जदार शेतकरी कारवाईच्या विळख्यात सापडले आहेत. गंभीर म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ११३ खातेदारांच्या जमिनी जप्त करून लिलावाची कारवाई होईल.त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पुढे येऊन आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे. सरसकट कर्जमाफीसाठी उग्र आंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धार रविवारी (ता. २२) भारम येथे झालेल्या कर्जमुक्ती अभियान बैठकीत करण्यात आला.
निवडणुका संपताच थकबाकीदारांवर जिल्हा बँक धडक कारवाई करून जमीन जप्ती व लिलाव करण्याच्या तयारीत आहे. ही टांगती तलवार असल्याने शासनाकडून सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी भारम येथे बैठक पार पडली. शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे तालुका संयोजक भागवतराव सोनवणे, अशोक आव्हाड, भीमराज आवारे,शामराव सोमासे, भाऊसाहेब आहेर, समाधान सोमोसे, नाना बोंबले, छबू सोमसे, गोरख गायकवाड, कैलास पवार, श्रावण देवरे, ज्ञानेश्वर नरोडे, रवींद्र सोमासे, साहेबराव सोमासे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची २०२४ अखेर ५६ हजार ७९७ शेतकऱ्यांकडे ९९३ कोटी एवढी मुद्दल व्याजासह थकबाकी आहे. बँकेने व विविध कार्यकारी सहकारी संस्थेने सहकार कायद्यान्वये आतापर्यंत कलम १०१ अन्वये २८ हजार ४४५ लोकांच्या कारवाई केली आहे. सहकार कायदा कलम कायदा १०० अन्वये ७७५ शेतकऱ्यांच्या जमिनी या आधीच जप्त केल्या आहेत. १५ हजार ३३७ शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याची कारवाई सुरू कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. नव्या वर्षात पहिल्याच आठवड्यात ११४ खातेदारांच्या जमिनी जप्त करून त्यांची लिलाव करण्यात येणार आहे. या विषयावर व्यापक जनजागृतीसाठी भारम येथे चिंता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या कारवाई विरोधात तीव्र आंदोलन उभे करण्यात येणार आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे येवला तालुका संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केले.
तर हजारो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ
महाराष्ट्र राज्य शेतकरी संघर्ष समितीने नाशिक येथे जून २०२३ पासून धरणे आंदोलन सुरू आहे.लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात थंडावलेली कारवाई आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. हजारो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे, शेतकऱ्यांनी उठाव केल्याशिवाय जिल्हा बँक कारवाई थांबवणार नाही. बँकेकडून जमीन विक्रीमुळे शेतकरी भूमिहीन होऊ शकतात.
शेतजमिनीचा ताबा बळाचा वापर करून घेतला जाऊ शकतो, याबाबत शेतकरी गंभीर नाही. ज्यावर उपजीविका आहे अशी शेत जमीन शेतकऱ्यांच्या हातून निसटू शकते आता पुढे येऊन मोठे आंदोलन उभारण्याची गरज आहे. उग्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे यावेळी दृकश्राव्य मार्गदर्शन करताना शेतकरी समन्वय समितीचे संयोजक भगवान बोराडे म्हणाले. थकबाकीदार शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.