

Pune News: देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे. देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल ३३ लाख ५० हजार कोटींचे कर्ज थकीत आहे. सर्वाधिक थकबाक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे ७ लाख ३८ हजार कोटींचे कर्ज थकलेले आहे, अशी माहीती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहीतीवरून पुढे आले आहे.
संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाणिज्य मंत्र्यांनी ही माहीती दिली. भारतातील शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण वाढण्यामागे प्रामुख्याने तीन कारणे सांगता येतील. एकतर शेतीमधून उत्पादन कमी होत आहे. पिकांची उत्पादकता दिवसेंदिवस घटत आहे. कालबाह्य ठरत असलेले बियाणे आणि उत्पादन पध्दती यामुळे उत्पादकता कमी होत आहे.
शेतकऱ्यांना अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित बियाणे पुरवले जात नाही. सध्या अस्तित्वात असेलली बियाणे कीड रोगांना लगेच बळी पडतात. यामुळे नुकसान होते. शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणात तग धरणाऱ्या आणि कीडरोगांना प्रतिकारक तसेच जास्त उत्पादकता देणाऱ्या बियाण्यांची गरज आहे. मात्र सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे उत्पादकता कमी राहत आहे.
दुसरे कारण म्हणजे, वाढता उत्पादन खर्च. पीक घेण्यासाठी ज्याकाही निविष्ठा आणि इतर खर्च लागतो त्या सर्वांचे दर वाढत आहेत. खते, कीटकनाशके, अवजारे, यंत्रे, इंधन, मजुरी यांचे दर मागील तीन वर्षात जवळपास ३० टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. याचा थेट बोजा शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चावर पडत आहे. मजुरीची तर समस्या बिकट बनली आहे. सरकारचे विविध प्रकारचे अप्रत्यक्ष करही शेतकऱ्यांना भरावे लागत आहेत. त्याचाही बोजा शेतकऱ्यांवर पडत आहे.
तिसरे कारण म्हणजे, कमी भाव. शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले तरी त्याचा वाढलेला उत्पादन खर्च भरून निघेल, ऐवढा भाव बाजारात मिळत नाही. मागील तीन वर्षांपासून शेतीमालाचे भाव सतत कमी होत आहेत. त्याचा मात्र उत्पादन खर्च वाढत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तोट्यात शेती करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपल्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी इतर स्त्रोतांचा विचार करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण वाढत आहे.
देशातील शेतकऱ्यांकडे मार्च २०२४ पर्यंत ३३ लाख ५० हजार कोटींचे कर्ज होते. यात पीककर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे. त्यातही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडील कर्ज जास्त आहे. महाराष्ट्रातील १ कोटी ४६ लाख खातेधारकांकडे ७ लाख ३८ हजार कोटींचे कर्ज थकीत होते. महाराष्ट्रानंतर तमिळनाडूत थकबाकी आहे. तमिळनाडूत २ लाख ८८ हजार खातेधारकांकडे ३ लाख ४८ हजार कोटींचे कर्ज थकीत आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील थकबाकी तमिळनाडूच्यात तुलनेत दपटीहून अधिक आहे.
राज्यनिहाय थकीत कर्ज
राज्य….खातेधारक…थकबाकी
महाराष्ट्र…१.४६ कोटी…७.३८ लाख कोटी
तमिळनाडू…२.८८ कोटी…३.४८ लाख कोटी
आंध्र प्रदेश…१.५७ कोटी…३.०९ लाख कोटी
उत्तर प्रदेश…१.८० कोटी…२.३० लाख कोटी
राजस्थान…१.०५ कोटी…१.७५ लाख कोटी
कर्नाटक…१.६१ कोटी…१.५७ लाख कोटी
मध्य प्रदेश…९९ लाख…१.५० लाख कोटी
तेलंगणा…७७ लाख…१.४२ लाख कोटी
केरळ…१.०२ कोटी…१.४२ लाख कोटी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.