
Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यात रत्नागिरी -नागपूर तर संकेश्वर -बांदा या २ महामार्गांचे काम सुरू आहे. मात्र, या दोन्ही महामार्गामधील बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. शुक्रवारी(ता.२८) रत्नागिरी -नागपूर या महामार्गावरील जमीनीचे हस्तांतरण प्रकरणी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला तर संकेश्वर -बांदा महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना धारेवर धरले.
कोल्हापूर जिल्ह्यात नागपूर -रत्नागिरी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अंकली-चोकाक दरम्यानच्या महामार्गातील जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी आणि कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी अचानक सायंकाळी ६ च्या सुमारास महामार्ग रोखून धरला. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मोजणी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे सांगली कोल्हापूर महामार्गावर सुमारे ६ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती.
शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मोजणीला स्थगिती दिली असल्याचे सांगत शनिवारी (ता. १) बैठक घेऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले जाईल, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
संकेश्वर -बांदा महामार्गबाधित शेतकरी आक्रमक
संकेश्वर-बांदा महामार्गबाधित शेतकरी व महामार्गचे अधिकारी यांच्यामध्ये शुक्रवारी(ता.२८) तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी केली. शिवसेने (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आजऱ्याचे तहसीलदार समीर माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
शिंत्रे म्हणाले की, "मडिलगेचे शेतकरी भिवा गुरव यांच्या शेतातील माती उकरून नेली आहे. त्याचे पैसे दिले नाहीत. त्याचबरोबर जमीन सपाटीकरण केलेली नाही. शेवटच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत टोल सुरू करू देणार नाही." युवराज पोवार म्हणाले, "रस्त्याच्या ठेकेदाराला कोणत्याही कामात अडथळा आणला नाही. ही आमची चूक झाली काय?" धनगरमोळ्याजवळ रस्त्यातील गटारी अपूर्ण आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या घरात पाणी जात आहे. तो प्रश्न सोडवावा". यावेळी बाधित शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या.
महामार्गाचे कनिष्ठ अभियंता अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. निवृत्ती आडकूरकर, दिनेश कांबळे, भिमा गुरव, हरिबा कांबळे, ओमकार माद्याळकर, भाऊ कदम, सुनील निऊंगरे, आनंदा येसणे आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.