Pune News : पंजाब-हरियाणातील हमीभाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांवर ठाम असून दिल्लीच्या खनौरी आणि शंभू सीमांवर १३ फेब्रूवारीपासून आंदोलन करत आहेत. आंदोलक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मंगळवार (ता.१९) ३६ दिवस असून ते आपल्या मागण्या आणि आंदोलनावर ठाम आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील शिवमोग्गा येथील सभेतील केलेल्या वक्तव्यावरून शेतकरी नेते श्रवणसिंह पंढेर यांनी जोरदार निशाना साधला आहे. पंढेर यांनी, 'मोफत रेशन योजना' आणि 'शेतकऱ्यांच्या आत्महत्यां'वरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'आपण मोफत रेशन योजनेसह विविध योजनेचे श्रेय आपल्या सरकारला देता, मग देशात होणाऱ्या शेतकरी आत्महत्याबाबत ही थोडीफार जबाबदारी घ्या', असा टोला लगावला आहे.
कर्नाटकातील शिवमोग्गा येथील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या १० वर्षात भाजपचे काम देशाने पाहिले आहे. देशाचा विकास, गरीब कल्याण आणि शक्तिशाली भारत यांना भाजपचे प्राधान्य आहे. तर काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही". देशभरातील लाभार्थ्यांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाखो आणि कोटी लोकांपैकी बहुतेक लोक एससी, एसटी आणि ओबीसी समुदायातील आहेत. त्यामुळे भाजपला मत देताना हे मत सामाजिक न्यायासाठी असेल". तर आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखल्या असून देशातील १० कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढले. तसेच सध्या ८५ कोटी जनतेला मोफत रेशन दिले जात असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावरून पंढेर यांनी, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांच्यावर या श्रेय वादावरून जोरदार निशाना साधला आहे. पंढेर यांनी, सध्या गेल्या चार दिवसांपासून शहीद शुभकरण सिंह यांची अस्थि कलश यात्रा सुरू आहे. आज चौथ्या दिवशीही येथे हजारो शेतकरी नतमस्तक होत अभिवादन करण्यासाठी या यात्रेत सहभागी होत असल्याचे म्हटले आहे.
तसेच कर्नाटकातील शिवमोग्गा येथील सभेत, सरकारने देशातील १० कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढले. ८५ कोटी जनतेला मोफत रेशन दिल्याचे श्रेय पंतप्रधान मोदी घेत असल्याचे पंढेर यांनी म्हटले आहे.
तर 'दररोज या देशातील ११८ शेतकरी किंवा शेतमजूर कर्जाच्या बोजाखाली दबून आत्महत्या करत आहे. हे आकडे आपल्याच मंत्र्यांनी संसदेत मांडले आहेत. याचे श्रेय कोण घेणार?', असा सवाल पंढेर यांनी उपस्थित केला आहे. तसेच पंढेर यांनी, 'देशात होणाऱ्या शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या या आत्महत्यांची जबाबदारी थोडीफार तरी पंतप्रधानांनी घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच, 'मोदी सरकारने या देशावर १७५ लाख कोटींचे कर्ज केले असून यावर ते काहीच बोलत नाहीत, अशी टीका केली आहे.
३५ दिवसांत १० शेतकऱ्यांचा मृत्यू
पंजाब आणि हरियाणा शंभू सीमेवर ३६ दिवस शेतकऱ्यांचे आदोलन सुरू आहे. येथे गेल्या ३५ दिवसांत १० शेतकऱ्यांचा मृत्यू आंदोलना दरम्यान झाला आहे. तर सोमवारी (ता.१८) शंभू सीमेवर बिसन सिंग, बलकार सिंग आणि तेहल सिंग या तीन शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
आंदोलक शेतकऱ्यांची भूमिका
पंजाब-हरियाणातील शेतकरी आपल्या विविध मांगण्यांसाठी दिल्लीच्या खनौरी आणि शंभू सीमांवर बसले आहेत. तर आता देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आदर्श आचरसंहिता लागू झाली आहे. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतरही आणि देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आंदोलनापासून मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.
आरएसएसची टीका
पंजाब आणि हरियाना सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शनिवारी (ता.१६) टीका केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी, 'शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. तसेच शेतकरी आंदोलनाद्वारे पंजाबमध्ये फुटीरतावादी दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याची टीका त्यांनी केली होती.